महाराष्ट्रातील २० पेक्षा अधिक जिल्ह्यांना आणि विशेषत: मराठवाड्यातील धाराशिव, बीड, लातूर, संभाजीनगर आदी जिल्ह्यांना अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला आहे. या आपत्तीमध्ये केवळ पिकांचेच नुकसान झाले नाही तर जनावरेदेखील मोठ्या प्रमाणावर दगावली आहेत. नदीचा प्रवाह आणि पुराचा फटका एवढा जबरदस्त होता की शेतजमीनच वाहून गेली आहे.
नदीने प्रवाह बदलल्याने पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. सिंदफणा नदीच्या काठावरील गावांना मोठा फटका बसला आहे. तातडीनं पंचनामे करून मदतीची मागणी शेतकरी करीत आहेत.
advertisement
नदीने जवळपास 12 फूट खोल शेती कोरली आहे. बीडच्या सिंदफना नदीचा महापूर ओसरल्यानंतर उद्ध्वस्त झालेली शेती भयावह दिसत आहे. पूर ओसरल्यानंतर शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान समोर आलंय. पुरामुळे शेतकरी पुरता उद्ध्वस्त झालाय.
शेती पिकं जमीनदोस्त झालीत. अनेक जनावरं दगावले, अनेकांचे साहित्य पुराच्या परिसरात अस्ताव्यस्त पडलंय, जमीन खरडून गेलीये. कुणाची अर्धा एकर... कुणाची एक एकर... तर कुणाची दोन एकर. जिल्ह्यातील हिंगणे हवेली आणि टाकळगाव या सिंदफणा नदीच्या काठावर असलेल्या गावांना हा फटका बसला आहे. त्यामुळे आता या भागातील शेतकऱ्यांकडून खरडपट्टी पंचनामे करून याची स्वतंत्र मदत जाहीर करण्याची मागणी केली जातेय.
सिंधफणा ही गोदावरीची उपनदी
सिंधफणा ही महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातून वाहणारी नदी आहे. ती गोदावरीची उपनदी आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातल्या चिंचोली गावानजीक बालाघाट डोंगरांमध्ये ती उगम पावते. तिथून वाहत जाऊन माजलगाव तालुक्यातील मंजरथ गावाजवळ सिंदफणा गोदावरीस मिळते.