मोहित कंबोज यांना झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाचे अनेक कंत्राटे मिळाल्याने तसेच गेल्या काही वर्षांत अनेकानेक वादात अडकल्याने सक्रीय राजकारणातून कंबोज बाजूला झाले आहेत, असे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले होते. त्यानंतर कंबोज यांच्या राजकीय कारकीर्दीची जोरदार चर्चा झाली. एवढ्या कमी कालावधीत राजकारण करून शेकडो कोटींची माया जमविणारे कंबोज राजकारणापासून दूर का गेले, अशी चर्चा समाज माध्यमांवर होती. तसेच काँग्रेस नेत्या, खासदार वर्षा गायकवाड यांनीही कंबोज यांनी एसआरए प्रकल्पाच्या कंत्राटांवरून घेरले. या सगळ्या पार्श्वभूमीवर कंबोज यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
advertisement
मी राजकारणातून बाजूला झालो हे वृत्त खोडसाळपणाचे
मी राजकारणातून बाहेर पडलो, अशा बातम्या समाज माध्यमांवर तसेच मुख्य माध्यमांतही सुरू आहेत. पण मी कुणालाही अधिकृतपणे राजकारणातून बाहेर पडलो, असे सांगितले नाही. सक्रीय राजकारणात निवृत्त झाल्याचे वृत्त खोटे असल्याचे सांगत कुणीतरी खोडसाळपणे तसे वृत्त छापले आहे, असे मोहित कंबोज म्हणाले.
मोहित कंबोज यांचे वर्षा गायकवाड यांना चॅलेंज
मोहित कंबोज यांना शासनाने 30 एसआरए प्रकल्प दिल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केला. त्यावर बोलताना कंबोज म्हणाले, यापैकी कोणतेही पुरावे त्या सादर करू शकलेल्या नाहीत. वर्षा गायकवाड यांना विनंती आहे की असे कोणते ३० प्रकल्प शासनाने मला दिले याची अधिकृत माहिती जाहीर करा. जर जाहीर करणार नसाल तर तुम्ही राजकारणातून निवृत्त व्हा, असे आव्हान कंबोज यांनी दिले.
माझ्या कंपनीची विनाकारण बदनामी करू नका- कंबोज
माझ्यावर खोटे आरोप करून अनेकांना मोठे व्हायचे आहे. पण त्या सर्वांना मला सांगायचे आहे की माझ्या कंपनीची विनाकारण बदनामी करू नये. तुमच्याकडे अधिकृत माहिती असेल तर मला पाठवा. मग आपण चर्चा करू, असे कंबोज म्हणाले.