रामटेक मतदारसंघाचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. रामटेकची जागा भाजपने लढवावी अशी मागणीदेखील त्यांनी केली. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत मल्लिकार्जुन रेड्डी यांना पक्षातून निलंबित केले. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी सांगितले की, काही कारण नसताना मला निलंबित करण्यात आले आहे. या संदर्भात मी पक्षश्रेष्ठींना पत्र पाठवले आहे. मी 28 वर्षे पार्टीसाठी काम केले. यात माझा व्यक्तिगत स्वार्थ नव्हता असेही त्यांनी स्पष्ट केले. मला दोन वेळा संधी दिली त्यापैकी एक वेळ निवडून आलो आणि ज्यांनी पार्टीच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवत निवडणूक जिंकली आणि पक्षाचं नुकसान केलं त्यालाच आता उमेदवार म्हणून पुन्हा जाहीर करण्यात आले असल्याची खदखद त्यांनी व्यक्त केली.
advertisement
रेड्डी यांनी पुढे म्हटले की, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र दिले आहे. तुम्ही एकतर्फी कारवाई केली ते योग्य नाही. पक्षासाठी योग्य बाब नसून मला एक संधी मला द्यायला पाहिजे होती. मी आपली भूमिका मांडली असती एकतर्फी कारवाई करणे योग्य नव्हतं. अनेक गोष्टी बोलताना मागेपुढे होत असतात एवढे मोठे कारवाई निवडणुकीआधी अशी कारवाई करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
गडकरी यांनी तयार केलेल्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण...
मल्लिकार्जुन रेड्डी यांनी म्हटले की, शिंदे गटाचं रामटेक मध्ये अस्तित्व नाही. 2019 मध्ये त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार होता मग भाजपला आता उमेदवारी द्यायला पाहिजे होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आमचे आदर्श नेतृत्व आहे. विकास पुरुष असून त्यांच्या हाताखाली तयार झालेले कार्यकर्ते आणि त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही रेड्डी यांनी व्यक्त केला.
माझा कार्यकर्त्यांशी संवाद सुरू आहे माझ्या अनेक कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत. मी पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. मला पदावरून निष्कसित केलं आहे. मी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला नाही. त्यामुळेच भाजपचा दुपट्टा माझ्या खांद्यावर असल्याचेही त्यांनी सांगितले.
