नेमकं काय घडलं?
रामेश्वर वर्मा नावाचे ट्रकचालक त्यांच्या गाडीतून जात असताना दोन तरुणी अचानक रस्त्यावर आडव्या आल्या अन् त्यांची गाडी अडवली. त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील ८ हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले. या प्रकारामुळे घाबरलेल्या वर्मा यांनी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला (११२) फोन करून मदतीची मागणी केली. माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी परिसराची नाकाबंदी करून आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी पोलिसांना दोन तरुण संशयितरित्या फिरताना दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, ते तरुण नसून तरुणी असल्याचे उघड झाले.
advertisement
३० हून अधिक ट्रकचालकांना लुटलं
पोलिसांनी या दोन्ही तरुणींची कसून चौकशी केली असता, त्यांनी आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली. मागील सहा महिन्यांत त्यांनी ३० हून अधिक ट्रकचालकांना लुटल्याचे त्यांनी सांगितले. या टोळीत एकूण पाच जण असून, त्यात दोन तरुणींसह तीन पुरुष साथीदारांचा समावेश आहे. या टोळीचा मुख्य सूत्रधार निशांत सूर्यवंशी आणि प्रवीण सूर्यवंशी असल्याचेही उघड झाले आहे.
फरार आरोपींचा शोध सुरू
दरम्यान, पोलीस चौकशी सुरू असतानाच या दोन्ही तरुणींचे तीन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी तातडीने त्यांचा शोध सुरू केला असून, लवकरच त्यांनाही अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. मुलांचा वेश धारण करून तरुणींनी केलेल्या या लुटीच्या प्रकारामुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. वाहनचालकांनी रात्रीच्या वेळी प्रवास करताना सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या टोळीचा आणखी काही गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.