मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या देवाभाऊ कॅम्पेन महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलीय. आधी वृत्तपत्र, नंतर भिंतींवर झळकलेली जाहिरीत, नंतर बॅनर्स आणि घरं.. मुख्यमंत्र्यांच्या या देवाभाऊ कॅम्पेनला प्रत्युत्तर म्हणून आता आता पवारांच्या राष्ट्रवादीनं 'देवा तूच सांग' नावाचं नवे कॅम्पेन सुरू केले आहे. सोमवारी पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीने नाशकात भव्य आक्रोश मोर्चा काढला जातोय. या मोर्चाचं आवाहन देत, जिल्ह्यातील सर्व दैनिकांमध्ये देवा तूच सांग अशा आशयाच्या जाहिराती छापण्यात आल्या आहेत.
advertisement
या जाहिरींमधून शेतकरी कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, शेतीपीक विमा, कांदा निर्यातबंदी, अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान, लाडक्या बहिणींना 2100 रुपये मानधन, युवकांना रोजगार कधी मिळणार? असे सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री आणि सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीनं केलाय. या जाहिरातबाजीद्वारे पवारांच्या राष्ट्रवादीनं सोमवारच्या मोर्चाची मोर्चेबांधणी केल्याचं पाहायला मिळतंय.
पवारांच्या राष्ट्रवादीच्या या सवालांवर भाजपनंही पलटवार केलाय.. मुख्यमंत्र्याचं देवाभाऊ कॅम्पेन पाहून विरोधकांना पोटदुखी सुरू झाल्याचा टोला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना लगावलाय..
मराठा आरक्षणाच्या जीआर निघताच देवेंद्र फडणवीसांचा फोटो असलेली देवाभाऊ कॅम्पेननं जोर पकडला होता. जाहिराती, बॅनरबाजी, सोशल मीडिया कॅम्पेन अशा सर्वच स्तरावर देवाभाऊंचा बोलबाला दिसला. पण, आता राष्ट्रवादीनं याच मुद्द्यावरुन सरकारला घेरण्याची तयारी केलीय. शेतकरी, बेरोजगार आणि लाडक्या बहिणींच्या प्रश्नांसाठी आक्रोश मोर्चा काढला जातोय. त्यामुळे सोमवारच्या या मोर्चाला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.