नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि त्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी राज्य सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय तसेच महाराष्ट्र सदन यांच्या माध्यमातून राज्य शासन नेपाळमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात असून राज्यातील पर्यटकांना आवश्यक ती मदत पुरविण्याचे प्रयत्न करत आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या प्रत्येक पर्यटकाला सुरक्षितपणे घरी परत आणणे आणि त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणे हीच प्राथमिकता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
advertisement
सर्व पर्यटक सुरक्षित: अजित पवार
राज्यातील ठाणे, पुणे, मुंबई, लातूर, कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 300 पर्यटक नेपाळमध्ये अडकल्याची माहिती मिळाली आहे. त्याव्यतिरिक्त बीड जिल्ह्यातून गेलेले पर्यटक रस्ता मार्गे खासगी वाहनाने परत येण्यासाठी निघालेले असून ते उत्तर प्रदेशात गोरखपूरपर्यंत पोहचले आहेत. सर्वाधिक पर्यटक ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील आहेत. अडकलेल्या पर्यटकांना आवश्यक ती मदत करण्यासाठी राज्य शासन तत्पर असून त्यांच्याशी संपर्क साधून आहे. सर्व पर्यटक सुरक्षित आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
मुरबाड तालुक्यातील 47 पर्यंटक अडकले
नेपाळच्या काठमांडू परिसरात मुरबाड तालुक्यातील 47 भारतीय पर्यटक सात दिवसांपूर्वी पर्यटनासाठी गेले होते. मात्र हिंसाचार सुरू झाल्यानंतर पशुपतिनाथ मंदिर परिसरात ते अडकून पडले तर 65 भारतीय पर्यटक हे पोखरण परिसरात अडकलेले आहेत .यातील काही पर्यटकांना विशेष विमानाने तर पोखरण परिसरात अडकलेल्या पर्यटकांना रस्ते मार्गाने भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती भाजप आमदार किसन कथोरे यांनी दिली.यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बोलणं झालं असून लवकरात लवकर त्यांना भारतात आणलं जाईल असं आश्वासन आमदार कथोरे यांनी दिलंय