तज्ज्ञांच्या मते, टोमॅटो आणि मिरची पिकांसाठी मल्चिंग तंत्राचा वापर अत्यंत प्रभावी ठरतो. मातीवर गवत, सुकलेली पाने किंवा प्लास्टिक शीट घातल्यास ओलावा टिकतो आणि तापमान स्थिर राहते. थंडी वाढल्यास झाडांना शेड नेट किंवा सूती कापडाने झाकणे ही साधी पण परिणामकारक पद्धत आहे. तसेच, सकाळी लवकर किंवा रात्री पाणी देणे टाळावे आणि पाणी दुपारी द्यावे, जेव्हा तापमान थोडे वाढलेले असते.
advertisement
मेथीसारख्या पालेभाज्यांसाठी शेतकरी सेंद्रिय द्रावणांचा वापर करून उत्पादन टिकवू शकतात. नीम अर्क, शेणखत आणि गोमूत्र आधारित खतांचा वापर केल्यास मातीतील सूक्ष्मजीव सक्रिय राहतात आणि झाडांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अत्यंत गारठा पडल्यास झाडांवर पांढरे डाग दिसू शकतात, अशावेळी शेतकऱ्यांनी पिकांवर हलकं पाणी फवारून तापमान नियंत्रित ठेवावं.
परदेशातील शेती तंत्रज्ञानाचा विचार करता, तिथे ग्रीनहाऊस आणि हायड्रोपोनिक शेती मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. या पद्धतींमुळे बाहेरील तापमान गोठवणारे असले तरी झाडांची वाढ अबाधित राहते. मराठवाड्यातही काही शेतकरी या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहेत, मात्र बहुतांश शेतकऱ्यांसाठी साधे आणि कमी खर्चिक उपायच उपयुक्त ठरतात.
शेतकरी संघटनांच्या मते, हिवाळ्यात योग्य व्यवस्थापन केल्यास पिकांची उत्पादकता आणि गुणवत्ता दोन्ही टिकवता येतात. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी थंडी, दवबिंदू आणि गारपीट यांचा परिणाम लक्षात घेऊन पिकांचे नियोजन करणे गरजेचे आहे. योग्य काळजी आणि नव्या तंत्रांचा अवलंब केल्यास मराठवाड्यातील शेतकरी हिवाळ्यातही चांगले उत्पन्न मिळवू शकतात, असा सल्ला कृषी तज्ज्ञांकडून दिला जात आहे.