पावसाळ्यात इंद्रायणी नदी जवळील कुंडमळ्यात पर्यटक नेहमी गर्दी करत असतात. रविवार असल्यामुळं दुपारी तीनच्या सुमारास पर्यटकांनी गर्दी केली होती.. काही जण पुलावर उभे होते यावेळी अचानक पूल कोसळला.त्यानंतर काहीजण नदीत पडले आणि वाहून गेले. याची माहिती मिळताच बचाव पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचलं आणि युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले. मात्र पर्यटक जर नेहमी इथं येत असतात मग त्यांच्या सुरक्षेसाठी इथं कोणत्याही उपाययोजना का नव्हत्या असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे.
advertisement
41 पर्यटाकांना NDRFच्या टीमकडून रेस्क्यू करण्या आले. तर, अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. जखमींवर तळेगावातील रुग्णालयात उपचार करण्यात आले. किरकोळ जखमी असलेल्यांना प्राथमिक उपचारानंतर घरी जाऊ देण्यात आले. तर, प्रकृती गंभीर असणाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू होते.
दरम्यान, काल रात्री कुंडमळा पुलाचा नदीत पडलेला लोखंडी सांगाडा नदीपात्रातून दूर करण्यात आला होता. ही दुर्घटना घडली तेव्हा कुंडमळा पुलावर तब्बल 100 जण असल्याचे सांगितले जाते. यापैकी तब्बल 50 जणांना बाहेर काढण्यात आले.
एनडीआरएफने बचाव कार्य थांबवले...
एनडीआरएफने आज सकाळी बचाव कार्य थांबवले असल्याचे सांगितले. पूल तुटल्याने इंद्रायणी नदीच्या प्रवाहात पडलेल्या 51 जणांची सुटका करण्यात आली. त्यामुळे आता प्रशासनाच्या आदेशानंतर बचाव मोहीम थांबवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. घटनास्थळी आज दुपारी ड्रोनच्या साहाय्याने हवाई सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. अपघाताबाबत अधिक माहिती घेण्यासाठी आणि कोणी पर्यटक नदीच्या प्रवाहात अडकला नसल्याची खात्री करण्यासाठी हवाई सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
