हा हल्ला झाल्यानंतर आयुषने या हल्ल्यातून वाचण्यासाठी सर्व प्रयत्न केले. पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण या अकरा पैकी तीन गोळ्या आयुषला लागल्या, आणि यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. खरं तर, वनराजच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुण्यात काहीतरी मोठं कांड घडणार, अशी गुप्त माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी चारच दिवसांपूर्वी एक मोठी कारवाई करत हत्यारं पुरवणाऱ्या आरोपीला अटक केली होती. यानंतर पोलिसांनी आंदेकर टोळीचा कट उधळल्याची चर्चा होती.
advertisement
मात्र ऐन गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात टोळीयुद्ध भडकलं आहे. वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश कोमकरच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी आयुष कोमकर क्लासवरून बाइकने घरी आला होता. तो बेसमेंटमध्ये असलेल्या पार्किंगमध्ये आपली दुचाकी लावत असताना, तिथे आधीपासून दबा धरून बसलेल्या दोघांनी आयुषवर गोळीबार करायला सुरुवात केली.
आपल्यावर हल्ला झाल्याचं समजताच आयुषने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळण्याचा प्रयत्न केला. पण हल्लेखोरांनी बेसमेंटमध्ये तब्बल ११ राऊंड फायर केलं. यातील तीन गोळ्या आयुषला लागल्या, ज्यात आयुषचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. आता सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणावर पुणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेत कुणीही जबाबदार असेल तर त्याला सोडलं जाणार नाही. मयताला न्याय मिळवून देणार, अशी प्रतिक्रिया पिंगळे यांनी दिली.
पोलीस उपायुक्त नेमकं काय म्हणाले?
पुणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे म्हणाले, "या सगळ्या प्रकरणाचा दोन तासांत उलगडा झाला आहे. मयताचं नाव आयुष गणेश कोमकर आहे. तो क्लासवरून घरी आल्यानंतर बेसमेटमध्ये त्याच्यावर दोन जणांनी फायरींग केली. आयुषचे वडील गणेश कोमकर हा मागील वर्षी झालेल्या वनराज आंदेकरच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. पोलीस प्रत्येक बाबींचा विचार करून चौकशी करत आहे. एकदम आततायीपणे निष्कर्षापर्यंत पोहोचणं योग्य नाही. या घटनेला जो जबाबदार असेल, त्याला कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही. प्राथमिकदृष्ट्या या प्रकरणात दोघांचा समावेश असल्याचं दिसून आलं आहे. मात्र यात आणखी लोक गुंतलेले असू शकतात, असा आम्हाला संशय आहे."
"मयत व्यक्तीला न्याय देणं आमचं काम आहे, आणि आम्ही त्याला न्याय मिळवून देऊ. पोलीस आतापर्यंत चोखपणे आपलं काम पार पाडत आले आहेत. येथून पुढेही पार पाडू. हा जो गुन्हा आहे, हा गुन्हा कुठल्याही चौकटीत कुणालाही माफ करण्यासारखा नाही. लोकांनी आम्हाला साथ द्यायची आहे. कुठल्याही अफवा पसरवायच्या नाहीत. चुकीची माहिती पसरवायची नाही. आम्ही आमचं काम निश्चितपणे पार पाडणार, येथून मागेही आम्ही आमचं काम पार पाडलं आहे. आता चुकीला माफी नाही. प्रत्येक गोष्ट करताना गुन्हेगारांनी १०० वेळा विचार करावा", असंही पोलीस उपायुक्त पिंगळे म्हणाले.