लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे केंद्रीय निवडणूक आयोगाला सातत्याने लक्ष्य करीत आहेत. मतदार यादीतील अनियमितता आणि मतचोरीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यांच्या जीवाला धोका आहे, असा आरोप राहुल गांधी यांच्या वकिलांनी पुणे न्यायालयात केला. सावरकर मानहानी प्रकरणातील सुनावणीदरम्यान राहुल गांधी यांच्या वकिलांनी जीविताला धोका असल्याचा आरोप केल्यानंतर देशभरात गजहब माजला. मात्र काँग्रेस पक्षाने वकिलांच्या दाव्यावर तत्काळ आक्षेप नोंदवला.
advertisement
राहुल गांधींना ते वक्तव्य आवडले नाही
काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी एक्स माध्यमावर पोस्ट लिहून राहुल गांधी वकिलाच्या मताशी सहमत नसल्याचे सांगितले. श्रीनेत म्हणाल्या, "राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे की त्यांची या विधानाशी अजिबात सहमती नाही. त्यामुळे उद्या त्यांच्या वकिलांकडून हे लेखी विधान न्यायालयातून परत घेतले जाणार आहे. या प्रकरणावर राहुल गांधी यांनी अधिकृत निवेदन जारी केले आहे."
परवान्यातील मजकूर राहुल गांधी यांना अमान्य, उद्या परवाना मागे घेण्यासाठी अर्ज करतो
परवान्यातील मजकूर मी माझे अशील राहुल गांधी यांच्याशी सल्लामसलत न करता तयार केला होता. माझ्या अशिलाने १३ ऑगस्ट २०२५ रोजीच्या या परवान्याला तीव्र विरोध केला आहे आणि परवान्यातील मजकुराशी त्यांनी असहमती व्यक्त केली आहे. मी उद्या माननीय न्यायालयात सदर परवाना मागे घेण्यासाठी औपचारिक अर्ज दाखल करेन, असे अॅड. मिलिंद दत्तात्रय पवार
यांनी सांगितले.