वरळी येथे मंगळवारी भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यात आमदार साटम यांनी ‘उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुंबई महापालिकेत सत्तेत आली तर 'खान' मुंबईचा महापौर होईल, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. ठाकरेंची शिवसेना खान महापौर करेल पण भाजप ते होऊ देणार नाही. मुंबईवर हिरवे संकट आले आहे. मुंबईचा रंग बदलण्याचा कोणताही प्रयत्न हाणून पाडला जाईल, असे अमित साटम म्हणाले होते.
advertisement
खान, डिसोझा, खानोलकर कुणीही मुंबईचा महापौर होऊ शकतं
अमित साटम यांचा समाचार घेताना आमदार रईस शेख म्हणाले, बोहरी, पारशी, ख्रिश्चन, मराठी, मुस्लिम कोणीही मुंबईचा महापौर होऊ शकतो. मुंबापुरी शहर काही भाजपची खाजगी जहागीर आहे काय? मुंबईकरांनी विश्वास व्यक्त केल्यास कोणत्याही जातीचा, धर्माचा मुंबईकर नागरिक या शहराचा महापौर होईल. मग, तो खान, डिसोझा नाही तर खानोलकर असू द्या... असे म्हणत रईस शेख यांनी अमित साटम यांना सणसणीत उत्तर दिले.
भाजपकडे मुंबईच्या विकासाचे मुद्दे नाहीत म्हणून धार्मिक तेढ वाढवतायेत
‘राज्यातील डबल इंजिन सरकार बंद पडले आहे. भाजपकडे मुंबईच्या विकासाचे काहीच मुद्दे राहिलेले नाहीत. त्यामुळे भाजप नेत्यांना निवडणूक काळात धार्मिक तेढ वाढविणाऱ्या मुद्द्यांना हात घालावा लागतो. भाजपला मुंबईचा विकास महत्वाचा वाटत नाही. त्यामुळे हे शहर असुरक्षितेतचा बागुलबुवा केला जातो आहे, असे आमदार रईस शेख म्हणाले.
या देशाच्या मातीत आमच्याही पूर्वजांचे रक्त
या देशातील मातीमध्ये आमच्याही पूर्वजांचे रक्त मिसळलेले आहे. राजकीय नेत्यांचा धर्म काय पाहता? विकासात नेत्याने दिलेले योगदान व काम पाहा’, असा टोलाही आमदार रईस शेख यांनी भाजपाचे मुंबई अध्यक्ष व आमदार अमीत साटम यांना लगावला आहे.