मुंबई: निवडणूक मतदार यादीतील त्रुटींसह इतर काही प्रक्रियांवर आक्षेप घेत महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांच्या भेटीसाठी पुन्हा दाखल झाले. मंगळवारी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर आज निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यासोबत मंत्रालयात बैठक सुरू झाली आहे. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळ आजही आक्रमक झाले असून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
advertisement
मंत्रालयात मंगळवारी झालेल्या बैठकीत मतदार यादींचा घोळ ते व्हीव्हीपॅटच्या मुद्यावर ठाकरे बंधूंनी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांना धारेवर धरलं होतं. त्यानंतर आज पुन्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले. राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यावरही ठाकरे बंधूंसह महाविकास आघाडीचे नेत्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली.
आम्ही विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान ज्या त्रुटी सांगितल्या होत्या त्यावर काम झाले नसल्याची तक्रार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत. त्याबाबतही अनेक तक्रारी असल्याचे त्यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, चोक्कलिंगम म्हणतात काही जबाबदारी आमच्याकडे नाही, राज्य निवडणूक आयोग म्हणतं आमच्याकडे नाही. मग, या तक्रारींबद्दल कोणाशी बोलायचं असा सवाल ठाकरे यांनी केला. त्रुटीसह जर निवडणुका घ्यायच्या असेल तर निवडणुका कशाला घेता... ड्रायरेक्ट election for selection करून टाका असा संताप ठाकरे यांनी व्यक्त केला.
तोपर्यंत निवडणूक घेऊ नका, राज ठाकरेही आक्रमक...
निवडणुका या राजकीय पक्ष लढवतात. मात्र, राजकीय पक्षांना शेवटची मतदार यादी दाखवत का नाही असा सवाल राज ठाकरे यांनी केला. मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी? असे म्हणत सर्व राजकीय पक्षांचं एकमत होत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नका अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. सत्तेतील तीन पक्षांसाठी तुम्ही काम करत नाही. आमचं तुमचं करू नका, आमच्यासाठी निवडणूक आयोग एकच असल्याचं राज ठाकरे यांनी थेट सुनावलं.
राज ठाकरे यांच्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यादीत खुप घोळ तर मग ही निवडणूक पारदर्शक कशी? असा सवाल केला. भाजपचा व्यक्ती निवडणूक आयोगाच्या माध्यमाचे काम हाताळत असल्याचा आरोप त्यांनी केला.
उद्धव-राज यांचे सूर जुळले...
उद्धव ठाकरे यांनी राज यांच्या मागणीला पाठिंबा देताना सत्य स्वीकारा आणि निवडणूक रद्द करा असे त्यांनी म्हटले. VVPAT तुम्ही घेत नाही, म्हणजे सर्व पुरावे तुम्ही नष्ट कराल असेही ठाकरे यांनी म्हटले. निवडणूक आयोग हा काही हरिश्चंद्र नाही. व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणूक घ्या असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले. राज ठाकरेंनी म्हटले की, बॅलेटवर निवडणूक घेतली तर जास्त दिवस लागत असेल तर लागू देत. निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्याऐवजी काय काम असा सवाल केला.