आज वरळीत होणाऱ्या मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मुंबईतील या मेळाव्यासाठी उपस्थित राहण्यासाठी पुणे, नाशिकसह इतर भागातूनही कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले होते. आजच्या ऐतिहासिक विजयी मेळाव्यात कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजच्या मराठी मेळाव्यात राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
राज ठाकरे यांनी भाषणात काय म्हटले?
advertisement
राज ठाकरे यांनी म्हटले की, नुसत्या मोर्चाच्या चर्चेनंच माघार घ्यावी लागली. खरंतर आजचाही मेळावा शिवतीर्थ मैदानात व्हायला हवा होता, मैदान ओसंडून वाहिलं असतं. पाऊस आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या जागा मिळत नाही. बाहेर उभे आहेत त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो त्यांना इथे यायला मिळालं नाही म्हणून. मी माझ्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज जवळपास 20 वर्षांनंतर मी आणि उद्वव एकाच व्यासपिठावर येत आहोत. ज्या माननीय बाळासाहेबांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसांना जमलं. राज ठाकरेंच्या या शब्दाने उपस्थित लोकांनी टाळ्यांचा कडकडाट करत प्रतिसाद दिला.
सभेनंतर राज ठाकरे यांचं पहिल ट्वीट...
या ऐतिहासिक मेळाव्यानंतर राज ठाकरे यांनी पहिलं ट्वीट केले आहे. हिंदी सक्तीच्या बाबतीत मराठी माणसाने सरकारला झुकवलं त्यानंतर आज मुंबईत मराठी माणसांचा विजयी मेळावा झाला. या मेळाव्यात माझ्याकडून एक उल्लेख राहून गेला, त्याबद्दल आधीच दिलगीरी व्यक्त करतो. हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी वृत्तवाहिन्या, मराठी वर्तमानपत्रं, मराठीसाठी काम करणाऱ्या संस्था, अनेक दबावगट, तसेच काही मोजके कलाकार हे या लढ्याच्या वेळेस ठाम उभे राहिले त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन आणि आभार मानत असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले.
मराठी अस्मितेसाठी ही झालेली एकजूट अशीच कायम राहील. पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचे मी आभार मानत असल्याचेही राज ठाकरे यांनी म्हटले.