ठाकरे ब्रँण्डवरून पुन्हा एकदा राजकीय वादळ घोंघावू लागलं आहे. त्याचं कारण म्हणजे लवकरच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे ब्रँण्डच्या चर्चेनं जोर धरला आहे. त्याचं कारण म्हणजे खुद्द उद्धव ठाकरेंनी या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांवर निशाण साधलाय.
आता उद्धव ठाकरेंच्या आव्हानाला पार्श्वभूमी आहे ती नुकतेच झालेल्या मुंबईतील बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीची. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसेने एकत्रितपणे ही निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत ब्रँड ठाकरे असा प्रचार करण्यात आला होता. पण असं असतानाही बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या शिलेदारांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी ब्रँड ठाकरे संपल्याची टीका केली होती.
advertisement
त्या निवडणुकीत मी जास्त लक्ष दिलं नाही पण दाखवलं काय गेलं ठाकरे ब्रँड! ठाकरे ब्रँडला अजून सुरुवात नाही झाली. मग बघा तुमचा कसा बँड वाजतो, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला. उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू पालिका निवडणुकीत एकत्र येणार असल्याची चर्चा आहे.
उद्धव ठाकरेंनी या संभाव्य युती विषयी वारंवार सकारात्मक वक्तव्य केलं आहे. त्यामुळेचं ठाकरे बंधूंच्या पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास सत्ताधाऱ्यांसमोर मोठे राजकीय आव्हान उभं ठाकणार आहे. मराठी मतदारांचे भावनिक पाठबळही ठाकरे ब्रँण्डला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्यामुळेच ठाकरे ब्रँण्ड भोवती राजकारण फिरताना दिसतंय.