कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सत्तेची जोरदार तयारी सुरू केली आहे. शहरातील वाढत्या नागरी समस्यांचा मुद्दा उपस्थित करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रविवारी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “कल्याण-डोंबिवलीचा विकास हवा असेल तर महापौरांच्या खुर्चीवर भाजपचाच नगरसेवक बसला पाहिजे.”
कल्याणमधील महाजनवाडी येथील सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते जतिन प्रजापती आणि त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी नवख्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत स्पष्ट संदेश दिला. त्यांनी म्हटले की, "पक्षात प्रवेश केलात, याचा अर्थ निवांत बसणं नाही. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही पालिका आणि प्रशासकीय यंत्रणांशी लढा द्या, असे त्यांनी म्हटले.
advertisement
शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता...
भाजपच्या या कार्यक्रमामुळे आणि कल्याण परिसर ‘भाजपमय’ करण्याच्या सूचनांमुळे शिवसेना शिंदे गटात गोटात अस्वस्थता पसरली आहे. गेल्या दोन दशकांपासून कल्याण-डोंबिवली पालिकेवर शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. मागील निवडणुकीत शिवसेना सरस ठरली होती. शिवसेनेतील फुटीनंतर या ठिकाणी शिंदे गटाची पकड अधिक मजबूत असल्याचे सांगण्यात आले.
आता मात्र, भाजप थेट महापौर पदासाठी दावा ठोकला आहे. पालिकेतील सत्ता संतुलनासाठी दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता अधिकच गडद झाली आहे. एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघात कल्याण-डोंबिवलीचा समावेश होतो. त्यामुळे कडोंमपात भाजपचा महापौर आल्यास त्याचा परिणाम लोकसभा मतदारसंघाच्या समीकरणांवरही होण्याची शक्यता आहे.
