बैठकीदरम्यान संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप आमदारांना मार्गदर्शन करत स्पष्ट संदेश दिला की, “लोकांना तुम्ही त्यांचे आमदार वाटले पाहिजे, अशी कामगिरी व्हायला हवी.” तसेच, लोकांपर्यंत अधिकाधिक पोहोचण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. “विधानसभा निवडणुकीइतक्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महत्त्वाच्या असून, त्याकडे गांभीर्याने पाहा. स्थानिक पातळीवरील संपर्क, कार्य आणि जनतेच्या समस्या सोडविण्याकडे लक्ष केंद्रित करा,” असा ठोस संदेश देण्यात आला.
advertisement
या बैठकीत आमदारांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कामगिरी, अडचणी, आणि स्थानिक विकासाबाबतची माहिती मांडली. संघाच्या वरिष्ठांनी त्यांच्याकडून अपेक्षित असलेल्या जबाबदाऱ्या समजावून सांगत “राजकीय यशासाठी समाजाशी नाळ जुळलेली असावी लागते,” हे स्पष्ट केले.
संघ आणि भाजपमधील ही समन्वय बैठक पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी महत्त्वाची ठरत असून, आगामी निवडणुकांसाठी भाजप आमदारांना अधिक जबाबदारीने आणि जनतेच्या अपेक्षांनुसार काम करण्याचे निर्देश देण्यात आले.
या बैठकीत स्थानिक स्तरावरील प्रभावी जनसंपर्क, समाजमाध्यमांचा योग्य वापर, आणि जनतेशी संवाद वाढवण्याच्या मुद्द्यांवरही सविस्तर चर्चा झाली.याच प्रकारच्या बैठका यापूर्वी ही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाल्या होत्या. विशेषतः लोकल निवडणुकांमध्ये भाजपा बसलेला फटका त्यानंतर संघ सक्षम पणे विधानसभा निवडणुकीत मायक्रो प्लॅनिंग करताना पाहायला मिळाला. यामुळेच विधानसभा निवडणुकीत विजयाच्या श्रेयामध्ये संघाचा देखील तितकाच सहभाग असल्याचं पाहायला मिळाल होतं आणि आता देखील स्थानिक निवडणुका तोंडावर असताना संघ सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे
या मार्गदर्शनानंतर आमदारांनी आपली भूमिका अधिक सकारात्मक, लोकाभिमुख व कार्यक्षम बनवण्याची ग्वाही दिली. पक्षाच्या भविष्यातील विजयासाठी संघटनात्मक बळ वाढवण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.