सुनिल घरत, प्रतिनिधी, शहापूर : समृद्धी महामार्गावर शहापूरजवळ दोन वेगवेगळे भीषण अपघात झाले. मध्यरात्रीनंतर झालेल्या या अपघात एक जण ठार झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहे. मागील काही महिन्यांपासून शहापूरजवळ अपघात होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनांनी महामार्गावरील सुरक्षित प्रवासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे.
advertisement
पहिली घटना मध्यरात्री साधारण 12 वाजता चॅनल क्रमांक 674, खूटघर टोल नाका परिसरात घडली. महिंद्रा पिकअप वाहनाने मालवाहतूक ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत जिगर कृष्णा अमराव (रा. गंगापूर, औरंगाबाद) याचा जागीच मृत्यू झाला, तर राहुल मकासरे (रा. लासूर, ता. गंगापूर) गंभीर जखमी झाला. घटनास्थळी दाखल झालेल्या जीवरक्षक दलाच्या सदस्यांनी तत्काळ जखमीला शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
दरम्यान, दुसरा अपघात रात्री साधारण दोनच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर, चॅनल क्रमांक 652 खर्डी परिसरात झाला. पिकअप गाडी चालकाने ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या घटनेत पिकअप चालक अरबाज शेख (रा. खर्डी) गंभीर जखमी झाला असून त्यालाही जीवरक्षक टीमच्या युवकांनी वेळेवर मदत करून शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
दोन्ही अपघातांनंतर रात्रीच्या वेळी घटनास्थळी दाखल झालेल्या जीवरक्षक टीमच्या तत्परतेमुळे अनेकांचे जीव वाचले. मात्र, समृद्धी महामार्गावरील वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे चालकांच्या सुरक्षेचे प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे पुढे आले आहेत.