शेतकरी नेते संतापले
'मुख्यमंत्री "माझा लाडका भाऊ' योजनेवरून शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते रघुनाथदादा पाटील यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. सरकारला भिकेचे डोहाळे लागले असून सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का? असा संतप्त सवाल करत सरकारच्या पैशातून मते खरेदी करण्याचा हा प्रकार असल्याची घणाघाती टीका रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे. तसेच तरुणांना रोजगार आणि उद्योगधंदे हवे आहेत, शेतकऱ्यांच्या मुलाला शेतीमालाला आणि दुधाला हमीभाव पाहिजे. पण भांग, गांजा पिऊन नशेत असलेल्या सरकारकडून मतांच्या खरेदीसाठी पाहिजे ते करायची तयारी चाललेली आहे, अशी खरमरीत टीका करत लाडकी बहीण-भाऊ योजनेमुळे सरकारचा फायदा होणार नाही. उलट या सरकारला जनता खरी बसवेल आणि त्याची ही नांदी असल्याचे देखील रघुनाथदादा पाटील यांनी टोला लगावला आहे.
advertisement
'माझा लाडका भाऊ'चा लाभ कोणाला मिळणार?
12वी उत्तीर्ण तरुणांना दरमहा 6,000 रुपये दिले जातील.
डिप्लोमा करणाऱ्या तरुणांना 8 हजार रुपये दिले जाणार आहेत.
पदवीधर तरुणांना दरमहा 10,000 रुपये दिले जातील.
वाचा - विधानपरिषदेत जयंत पाटील पराभूत का झाले? शरद पवार पहिल्यांदाच बोलले
एकनाथ शिंदे म्हणाले, युवक एका वर्षासाठी कुठल्याही कंपनीत अप्रेंटिसशिप करेल. त्यानंतर त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी मिळेल. राज्यासह देशातील उद्योगांना कुशल तरुण उपलब्ध करून देणार आहोत. तरुणांना त्यांच्या नोकऱ्यांमध्ये कुशल बनवण्यासाठी सरकार हे पैसे देणार आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “या योजनेंतर्गत आमचे सरकार आपल्या राज्यातील तरुणांना ज्या कारखान्यांमध्ये काम करतील तेथे प्रशिक्षण घेण्यासाठी हे पैसे देणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच कोणत्याही सरकारने अशी योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून आम्ही बेरोजगारीवर उपाय शोधला आहे. या योजनेंतर्गत आपल्या तरुणांना कारखान्यांमध्ये प्रशिक्षण मिळेल आणि सरकार त्यांना स्टायपेंड देईल.