Vidhan Parishad : विधानपरिषदेत जयंत पाटील पराभूत का झाले? शरद पवार पहिल्यांदाच बोलले
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Vidhan Parishad : विधानपरिषद निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव का झाला? यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली.
चंद्रकांत फुंदे, पुणे : विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुरस्कृत उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला. महाविकास आघाडीतील काही आमदार फुटल्याने महायुतीने बाजी मारल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या सर्वाधिक आमदारांनी क्रोस वोटींग केल्याचा दावा आहे. दरम्यान, या सर्व घडामोडीनंतर आघाडीतील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. विधानपरिषद निवडणुकीत कुणी फसवलं? की आणखी काही झालं? यावर पवारांनी भाष्य केलंय.
काय म्हणाले शरद पवार?
शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या उमेदवारीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, त्यांच्या उमेदवारीबाबत महाविकास आघाडीत एकमत असं झालं नव्हतं. पण तरीही माझ्या मनात डाव्यांना कुठेतरी संधी मिळावी हे होतं. म्हणून माझ्या पक्षाची मते त्यांना देऊ केली होती. उद्धव ठाकरे यांनी त्यांचा उमेदवार दिला. काँग्रेसने प्रथम क्रमांकाची सर्व मते घ्यावीत. आणि दोन नंबरची मतं निम्मी सेना आणि जयंत पाटील यांना द्यावीत असं माझं मत होतं. तसं झालं असतं तर मविआचे तिन्ही उमेदवार जिंकले असते असं मला वाटतं. पण ते काही जमून आलं नाही. त्यामुळे कोणी कोणाला फसवले नाही, फक्त स्ट्रॅटेजी चुकली, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
advertisement
उद्धव ठाकरे हट्ट धरतात?
उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीत हट्ट करतात, कोणाचं ऐकत नाहीत का अशा चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. उद्धव ठाकरेंच्या हट्टाबाबत विचारताच शरद पवार म्हणाले की, थोडा स्वभाव असतो एखाद्याचा. कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता आपल्या पक्षाच्या हितासाठी आग्रही भूमिका घेत असतो. थोडं अॅडजस्ट करावं लागतं. आघाडी आहे म्हटल्यावर या गोष्टी पचवाव्या लागतात कारण लोकांसमोर एकञितपणे निवडणुकीला सामोरं जायचं आहे. थोडंफार इकडं तिकडं चालू राहतं.
advertisement
भुजबळांच्या भेटीबाबत प्रतिक्रिया
आरक्षणासंदर्भात भुजबळांनी भेट घेतली त्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, सरकारने मनोज जरांगे पाटील यांना काय आश्वासन दिलं हे मला माहिती नाही. पण आज राज्यात शांततेची गरज आहे. माझ्या मनात याबद्दल काही शंका नाही. शांतता निर्माण व्हायलाच हवी या मताचा मी आहे. जरांगे यांच्यासोबत सरकारने संवाद साधला असेल तर त्यात विरोधकांचं काम काय? असा प्रश्न शरद पवार यांनी विचारला. सत्ताधाऱ्यांनी सर्वपक्षीय बैठकीवरून केलेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिलं. विरोधकांना बाजूला ठेवंल आणि आता विचारतायत अशा शब्दात शरद पवार यांनी टोला लगावला.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
July 17, 2024 3:36 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Vidhan Parishad : विधानपरिषदेत जयंत पाटील पराभूत का झाले? शरद पवार पहिल्यांदाच बोलले