संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकात शिवसेनाप्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांनी अमित शाह यांनाही वाचवले असल्याचा दावा केला. संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकात म्हटले की, नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रात यूपीए सरकार होते आणि त्यांच्याविरुद्ध सीबीआयसह अनेक तपास संस्थांनी कारवाईचा मोर्चा उघडला होता. त्या काळात मोदींच्या सरकारमधील अनेक पोलिस अधिकारी तसेच तत्कालीन गृह राज्यमंत्री अमित शाह यांना अटक झाली होती. खुद्द नरेंद्र मोदी यांनाही अटक होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
advertisement
पवारांनी मोदींना वाचवलं...
संजय राऊत यांनी म्हटले की, या निर्णायक टप्प्यावर केंद्र सरकारमधील तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांनी एका मंत्रिमंडळ बैठकीत ठाम भूमिका घेतली. "लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या कोणत्याही मुख्यमंत्र्याला अटक करून तुरुंगात डांबणं योग्य नाही," असं परखड मत त्यांनी व्यक्त केलं. या भूमिकेला अनेक मंत्र्यांची मूक संमती मिळाल्याने, मोदी यांची अटक थांबली, असा राऊत यांनी दावा केला आहे.
अमित शहा यांच्यावरील खुनाच्या प्रकरणातही सीबीआयच्या एका विशेष पथकाने जामिनाला कडाडून विरोध केला होता. त्या पथकात महाराष्ट्र केडरचे एक वरिष्ठ अधिकारी होते. मात्र, नरेंद्र मोदी यांनी स्वतः शरद पवार यांची मदत मागितली आणि पवारांनीही आपल्या स्वभावानुसार हस्तक्षेप करत, अमित शहा यांना जामीन मिळवून दिला असल्याचा दावा राऊत यांनी आपल्या पुस्तकात केला.
शाह-मोदींनी मदतीची किती जाण ठेवली?
पण या सगळ्यानंतर "अमित शहा आणि मोदींनी शरद पवारांच्या या मदतीचे स्मरण किती ठेवले?" असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. याच पुस्तकात संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेने त्या काळात मोदी-शहा यांना दिलेल्या पाठिंब्याचाही उल्लेख केला आहे. संपूर्ण देश मोदींच्या विरोधात असताना सामना आणि ठाकरे घराणं त्यांच्यासोबत होतं. पण पुढे याच मोदींनी शिवसेनेला असुरी पद्धतीनं फोडलं असल्याचे राऊत यांनी म्हटले.