फलटणमधील महिला डॉक्टरच्या मृत्यूनं अवघा महाराष्ट्र हादरलाय. ज्या तऱ्हेनं या डॉक्टरनं हातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली, त्यानं साताऱ्यातील साखर सम्राट, पोलीस आणि आरोग्य यंत्रणेची मिलिभगत चव्हाट्यावर आलीय. पोलीस विभागातीलच पीएसआय गोपाळ बदनेवर डॉक्टरच्या शारिरीक आणि मानसिक छळाचा आरोप आहे. त्यामुळं पोलिसांच्या भूमिकेवरच संशय उपस्थित होत आहे. याच संशयात घेऱ्यात सापडलेल्या फलटण पोलिसांनी आता नव्यानं महिला डॉक्टरलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचे प्रयत्न सुरू केले.
advertisement
डॉक्टराच्या तक्रारीनंतरच का समोर आला?
16 जुलैला फलटण पोलीस निरीक्षकांनी या महिला डॉक्टरची तक्रार जिल्हा शल्य चिकित्सकांनी केल्याची माहिती आता पोलिसांकडून दिली जातेय. मृत डॉक्टरच्या वर्तणुकीवर या पत्रामधून आक्षेप नोंदवण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पण, पोलिसांचा हा आक्षेप मृत डॉक्टराच्या तक्रारीनंतरच का समोर आला? हा सवाल आहे.
- यातली सगळ्यात पहिली तक्रार ही मृत डॉक्टरनं 19 जूनला केली होती.
- 19 जूनचं हे तक्रार पत्र महिला डॉक्टरनं पोलीस उपअधीक्षकांना पाठवलं होतं.
- ज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या गैरवर्तनाविषयी महिला डॉक्टरने तक्रार केली
- डॉक्टरांनी थेटपणे API जायपत्रे,PSI पाटील आणि बदने यांची नावं लिहिली होती
पोलिसांच्या अरेरावीचा भांडाफोड
या पत्रानंतरच पोलिसांनी महिला डॉक्टरची तक्रार केली. 16 जुलैला जिल्हा शल्य चिकित्सकांना पोलीस निरीक्षकांना पत्र लिहून महिला डॉक्टरच्या वर्तणुकीवर आक्षेप नोंदवला. पण, ज्या पोलिसांची महिला डॉक्टरनं तक्रार केली, त्यांच्यावर पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. त्यामुळं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर त्यांच्याच अधिकाऱ्यांकडून सवाल उपस्थित केले जातायेत. विशेष म्हणजे, पोलिसांनी महिला डॉक्टरची तक्रार केल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी तात्काळ यावर चौकशी समितीही बसवली. ज्या चौकशी समितीला महिला डॉक्टरानं विस्तृत खुलासाही केला. चार पानी पत्र लिहीत महिला डॉक्टरनं पोलिसांचे आरोप फेटाळले. ज्यात तारखेनुसार पोलिसांच्या अरेरावीचा भांडाफोड केला.
महिला डॉक्टरची पोलिसांच्या आरोपांना मुद्देसूदपणे उत्तरं
महिला डॉक्टरनं पोलिसांच्या आरोपांना मुद्देसूदपणे उत्तरं दिली. 31जुलै 2025 रोजी 3 आरोपींचे रिपोर्ट कसे बदलले गेले हे उघड केलं. 9 जुलै आणि 16 जुलैला आरोपींना फिट दाखवण्यासाठी पोलिसांनी दबाव टाकल्याचा उल्लेख डॉक्टरनं केला. बदने आणि इतर पोलिस अधिकाऱ्यांच्या अरेरावीचा उल्लेखही डॉक्टरनं केला. फेब्रुवारीपासून अशा प्रकारे त्रास दिला जात असल्याचा आणि वैयक्तिक जीवनात अडथळा आणला जात असल्याचाही दावा डॉक्टरनं या खुलासा पत्रात केला. याच पत्रात खासदारांनी पीएद्वारे कशाप्रकारे दबाव टाकला
आणि बीडच्या असल्यानं हिणवल्याचाही उल्लेख महिला डॉक्टरनं केलेला.
या 4 पानी पत्रात महिला डॉक्टरांना पोलिसांच्या प्रत्येक आरोपाला पुराव्यानिशी उत्तर दिलेलं. एवढंच नाही तर 13 ऑगस्ट 2025 ला या महिला डॉक्टरनं संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली? याचीही माहिती आरटीआयद्वारे मागण्याचा प्रयत्न केला. पण, पोलीस हलले नाही. आता मात्र डॉक्टरच्या मृत्यूनंकर पोलीस तिच्याविरोधात केलेलं तक्रार पत्र उजेडात आणत स्वत:ची सुटका करण्याचा प्रयत्न करतायेत. पण, पोलिसांचा हा प्रयत्न म्हणजे मृत्यूनंतरही छळण्याचा प्रकार असल्याचं विरोधक सांगतायेत.
खरंतर एक उच्चशिक्षित डॉक्टरनं शारीरीक आणि मानसिक छळाला कंटाळून स्वत:च आयुष्य संपवलं. साखर कारखानदादांची दादागिरी आणि त्यांच्या मुजोरीला मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या छळानं महिला डॉक्टरचा बळी घेतल्याचा आरोप केला जातोय. त्यामुळं मयत महिला डॉक्टरला न्याय देण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं असताना, पोलीस खरंच यासाठी प्रयत्न करतायेत का? हा सवाल आहे.
