राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाशिक येथे शेतकरी आक्रोश मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यातून बळीराज्याच्या प्रश्नांवरती शरद पवार यांनी आवाज उठवून राज्य सरकारला चांगलेच कोंडीत पकडले. विशेषत: देवाभाऊ म्हणत सुरू असलेल्या प्रचारावरच घाव घालत देवाभाऊ बळीराजासाठी काम करीत नसल्याचे त्यांनी बिंबविण्याचा प्रयत्न केला.
गेल्या २ महिन्यात २ हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या
advertisement
आज काळ्या आईशी इमान राखणारे शेतकरी अस्वस्थ आहे. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ असतो. अतिवृष्टी झाली तर त्याचा परिणाम शेतकरी वर्गावर झाला. संकट आल्यावर राज्य आणि केंद्राची जबाबदारी असते. पण आजचे राज्यकर् जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. गेल्या २ महिन्यात २ हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकरी जीव देतो, एवढी टोकाची भूमिका घेतो परंतु असे असतानाही संकटाच्या काळात राज्यकर्ते त्याच्या मागे उभे राहत नाही ही फार गंभीर गोष्ट आहे. म्हणून जीव देण्याचा विचार शेतकरी करतोय, असे पवार म्हणाले.
यूपीए काळातील शेतकरी कर्जमाफीची गोष्ट पवारांनी सांगितली
मी शेती खात्याचा मंत्री होतो. माझ्या वाचनात शेतकरी आत्महत्येची घटना आली. पंतप्रधान मनमोहन सिंग यांना विनंती केली की शेतकरी जीव देतोय हे आपण समजून घेतले पाहिजे. दिल्लीत बसून होणार नाही. जिल्ह्याजिल्ह्यांत जाऊन समजून घेऊ अशी विनंती मी त्यांना केली. पंतप्रधान सिंग तयार झाले आणि नागपूर, अमरावती, यवतमाळला आम्ही गेलो. आत्महत्या केलेल्या कुटुंबाची आम्ही भेट घेतली. शेतकऱ्यांच्या बायका ढसाढसा रडत होत्या. मी विचारले तुम्ही का रडताय? त्यावर सोसायटीचे कर्ज काढले होते, ते आता थकले आहे, खाजगी सावकारकडचे कर्ज थकले आहे. मालकाला सहन झाले नाही. त्यांनी जीवन संपवले, अशा तक्रारी माझ्याकडे आल्या. कर्जबाजारीपणा हा मोठा रोग आहे. त्यावर उपचार केले पाहिजे म्हणून ७० हजार कोटी रुपये देऊन कर्जमाफी केली, अशी आठवण पवार यांनी सांगितली.
नेपाळमध्ये काय झालं, खोलात जात नाही, देवाभाऊ शहाणपणाची भूमिका घेतील
नाशिकचा कांदा जगात जातो. पैसे आल्यावर मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण करतो. त्यात सरकारने निर्यातीला बंदी केली. इथे किंमत देत नाही आणि बाहेर विकू देत नाही. तीच गोष्ट सोयाबीन आणि इतर शेतीची आहे. राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांचे दुखणे समजत नाही. देवाभाऊंनी सगळ्या महाराष्ट्रात पोस्टर लावले. शिवाजी महाराजांचे दर्शन घेत असल्याचे दाखवले. बळीराजा उपाशी राहत कामा नये, अशी शिवरायांची शिकवण होती. तो आदर्श देवाभाऊ घेतील असे वाटले होते पण त्यांनी तसे केले नाही. राज्यकर्ते बळीराजाकडे लक्ष देत नाहीत. शेतकऱ्यांच्या मोर्चाची दखल घेतली नाहीतर मोर्चा आणखी मोठे स्वरूप घेईल, असा इशारा देतानाच नेपाळमध्ये काय घडले आहे, त्याच्या खोलात मी जात नाही. देवाभाऊ शहाणपणा घेतील, असे सूचकपणे शरद पवार म्हणाले.