अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त आल्यानंतर पवार कुटुंबियांनी शरद पवार यांना मुंबईतील एका रुग्णालयात नेण्यात आले. तिथे गेल्यानंतर शरद पवार यांना अजित पवार यांच्या अपघाताची माहिती देण्यात आली. त्यानंतर दोन तासांनी शरद पवार हे त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्यासोबत बारामतीच्या दिशेने निघाले. दुपारी एक वाजताच्या सुमारास शरद पवार बारामतीत उतरले.
advertisement
अजितचं विमान कसं कोसळलं?
हेलिकॉप्टरमधून उतरल्याबरोबर शरद पवार यांनी अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक सुनीलकुमार मुसळे यांना जवळ बोलावले. अजितचं विमान कसं कोसळलं? अशी विचारपूस शरद पवार यांनी केली. त्यावर बरोबरच्या व्यक्तींनी त्यांना विमान कसे कोसळले, याची माहिती दिली. अजित पवार यांचे विमान धावपट्टीवर उतरण्याआधीच क्रॅश झाले. आधी त्यांच्या विमानाने धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न केला. परंतु दृष्यमानता कमी असल्यामुळे पुन्हा त्यांच्या विमानाने उड्डाण घेतले. त्यानंतर एक फेरी मारून झाल्यानंतर पुन्हा त्यांच्या विमानाने धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र धावपट्टीच्या अलिकडेच त्यांच्या विमानाने पेट घेतला.
अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरूवारी अंतिम संस्कार, मोदी शाह बारामतीला येणार
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात निधन झाले. अजित पवार यांच्या निधनाने राज्यात २८ ते ३० जानेवारी २०२६ या तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरूवारी सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानात अजित पवार यांच्यावर गुरूवारी सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. अजित पवार यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भारत सरकारमधील अनेक केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहित राज्यातले सगळेच मंत्री, लोकप्रतिनिधी उपस्थित असतील.
शासकीय दुखवट्याच्या तीन दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रातील ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येईल. तसेच या कालावधीत कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजित होणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे बुधवार, दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालये बंद राहतील, असे कळविण्यात आले आहे.
