राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नाशिक येथे ‘झेप विश्वासाची, स्वाभिमानी महाराष्ट्राची’ एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला शरद पवार यांनी मार्गदर्शन केले.
सरकारच्या समित्या कधीच एका जातीच्या नसाव्यात
शरद पवार म्हणाले, महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवायला लागली आहे, ही अतिशय चिंतेची बाब आहे. समाजात विभागणी होऊन कटुता वाढेल, असा निर्णय राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटसंदर्भात घेतला. बावनकुळे समितीत गिरीश महाजन वगळता केवळ ओबीसी सोडून दुसरे कोणी नाही. तर राधाकृष्ण विखेंच्या अध्यक्षतेखालील मराठा उपसमितीत सगळे मराठाच आहेत. खरे तर समितीत सगळ्या जातीचे लोक घ्यायला पाहिजेत. सरकारच्या समित्या कधीच एका जातीच्या नसाव्यात. या सरकारच्या राज्यात सामाजिक वीण विस्कटली असून ही धोक्याची घंटा आहे. सामाजिक ऐक्याबाबत कधीही तडजोड नाही.
advertisement
ज्यांच्या हातात सत्ता ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाहीत
आज केंद्रात ज्यांच्या हातात सत्ता आहे, ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाहीत. त्यामुळे शेतकरी संघटना अधिक प्रभावी करणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी मांडले. त्यांनी नाशिकच्या शेतकऱ्यांचे कौतुक केले, कारण हा जिल्हा आधुनिक शेती आणि नवनवीन प्रयोगांसाठी ओळखला जातो. शरद जोशींच्या नेतृत्वाखाली झालेल्या शेतकरी आंदोलनाची सुरुवात नाशिकमधूनच झाल्याची आठवणही पवार यांनी करून दिली.
नाशिक शहर गांधी, नेहरू यांच्या विचारावर चालणारे आहे. येथील शेतकरी प्रयोगशील असून द्राक्ष, डाळिंब ही प्रमुख पिके आहेत. कांद्याची सर्वाधिक निर्यातही याच जिल्ह्यातून होते. पण, आजघडीला केवळ नाशिकच नाही तर संपूर्ण राज्यातील शेतकरी संघर्ष करीत आहेत. केंद्र सरकारकडून निर्यातीवर बंधने घातली जात आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकार उदासीन आहे. तीन महिन्यात ११८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
आज केंद्र सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही आणि कांदा निर्यातीवर बंधने आहेत. नाशिक जिल्हा बँक आजारी असून, शेतकऱ्यांची ही बँक प्रचंड थकबाकीत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. राज्यातील शेतकरी संघर्ष करीत आहेत. केंद्र सरकारकडून निर्यातीवर बंधने घातली जात आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकार आणि राज्य सरकार उदासीन आहे.
सरकारच्या परराष्ट्र धोरणाची शरद पवार यांच्याकडून चिरफाड
देशाचा नकाशा पाहिला तर पाकिस्तान, नेपाळ अडचणीत आहेत. ज्या बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारताने मदत केली, तोही आज आपल्यासोबत नाही. श्रीलंकाही आपल्या बाजूने नाही. ट्रम्प यांची निती प्रत्येक वस्तूवर टॅक्स लावण्याची आहे. मोदींनी आता परराष्ट्र धोरणाबाबत अधिक विचार करण्याची गरज आहे, असे पवार म्हणाले.