सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ मंगळवारी दुपारी साडे १२ वाजता निवडणूक आयुक्तांना भेटणार आहे. या शिष्टमंडळात मूळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आदी नेते उपस्थित राहणार आहेत, असे संजय राऊत यांनी सांगितले.
भेटीनंतर पत्रकार परिषद
शिष्टमंडळाच्या माध्यमातून लोकशाही वाचविण्याची विनंती निवडणूक आयुक्तांना करणार असल्याचे राऊत म्हणाले. भेटीनंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सर्व नेत्यांची पत्रकार परिषद होईल, असे देखील राऊत यांनी सांगितले. खूप वर्षांनंतर शरद पवार आणि राज ठाकरे हे एकाच मंचावर पत्रकार परिषद घेऊन संबोधित करतील.
advertisement
संजय राऊत यांचे देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रण
मुंबई महानगर पालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा लवकरच घोषित होतील. जिल्हा परिषदा, नगरपालिका आणि राज्यांतील महानगर पालिकांचा यात समावेश आहे. अत्यंत महत्वाच्या असलेल्या या निवडणुकांच्या यंत्रणेवर आणि प्रक्रियेवर कोणताही संशय राहू नये, निवडणूक पारदर्शक, निष्पक्ष पध्दतीने संविधानाचे पूर्ण पालन करून व्हाव्यात ही राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांची भूमिका आहे. सध्याच्या निवडणूक प्रक्रियेबाबत काही शंका नक्कीच आहेत. त्याबाबत चर्चा करण्यासाठी एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेणार आहेत. शिष्टमंडळात सहभागी होण्याबाबत शरद पवार, उध्दव ठाकरे, राज ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह इतर सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांना कळविले आहे. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. माझी देवेंद्र फडणवीस यांनाही विनंती आहे की आपण स्वतः सहभागी होऊन सर्वपक्षीय शिष्टमंडळाची प्रतिष्ठा वाढवावी. या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नसून लोकशाही बळकट व्हावी आणि निवडणूक यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ व्हावी हीच भावना आहे.