भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीत राहुनही मित्रपक्षांपेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे. मुंबईसह इतर महत्त्वाच्या महापालिकांवर भाजपने आपले लक्ष केंद्रीत केले आहे. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनाही भाजप घेरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ठाण्यातील शिंदेंचा गड सर करण्यासाठी भाजपकडून राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यावरही विशेष जबाबदारी सोपवली आहे. पालघरचे पालक मंत्री असणारे गणेश नाईक हे आता ठाण्यातही जनता दरबार घेणार आहेत.
advertisement
गणेश नाईक यांनी म्हटले की, नागरी सत्कारासाठी जर बोलले असते तर आलोच नसतो. मला या ठिकाणी सांगितलं गेलं कोपरी परिसरातील जी भारतीय जनता पार्टीचे कार्यकारणी यांच्या माध्यमातून सीनियर सिटीजनला कार्ड वाटप आणि आधार म्हणून काठी घेण्याचं काम होणार आहे. म्हणून मी त्यासाठी आलो आहे. सत्कार मी कधी स्वीकारणार नाही असं मी स्पष्ट केले असल्याचे नाईक यांनी सांगितले.
गणेश नाईकांचा ठाण्यात जनता दरबार....
गणेश नाईक यांनी आपल्या ठाण्यातील जनता दरबाराबाबत सांगितले की, राज्यात महायुतीचे सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार या तिघांच्या नेतृत्वाखाली महायुतीचा सरकार कार्यरत आहे. लहान मुलं , तरुण,जेष्ठ आणि महिला वर्गांना म्हणजे लाडकी बहीण घेऊन आता महाराष्ट्र थांबणार नाही. प्रगतीचा पथावर गतिमान होईल प्रकाशमय होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. दर दोन एक महिन्यांनी मी तिथे जनता दरबार लावणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ठाण्यामध्ये दर तीन महिन्यांनी जनता दरबार लावणार आहे. त्याशिवाय नवी मुंबई हा माझा मतदारसंघ आहे त्यामुळे मी दर महिन्यात जनता दरबार लावीन. शेवटी सरकारची ही संयुक्त जबाबदारी आहे. कोण छोटा कोण मोठा असं काही प्रश्न नसल्याचे त्यांनी सांगितले.
तर, ठाण्यातही यश संपादन करू...
गणेश नाईक यांनी ठाणे महापालिका निवडणुकीबाबत सूचक वक्तव्य केले. गणेश नाईक यांनी म्हटले की, नवी मुंबईमध्ये आजवर 1995 सालापासून मी ज्या पक्षात होतो त्या पक्षातून स्वबळावर निवडणूक लढवली. दुसरा कोणताही पार्टनर नाही. जर पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचे जाहीर केले तर आम्हाला कोणतीच अडचण नाही. भारतीय जनता पक्ष नवी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, वसई- विरार सगळीकडे त्या पद्धतीने ताकतीने उभा राहील. जनतेला सामोर जाईल असेही त्यांनी म्हटले. माझ्याकडे जबाबदारी दिल्यास नवी मुंबईप्रमाणे ठाण्यातही यश संपादन करू असा विश्वासही गणेश नाईकांनी व्यक्त केले.
