धुक्यामुळे अपघात झाल्याचा अंदाज
महामार्गावर पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या भीषण अपघाळामागचे मुख्य कारण दाट धुके असल्याची माहिती मिळाली आहे. पहाटेच्या वेळी महामार्गावर पसरलेल्या दाट धुक्यामुळे रस्त्याचा आणि समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज घेणे चालकांना शक्य झाले नाही. एका क्षणात वेगवान शिवशाही बस आणि सीएनजी ट्रकमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. धुक्याच्या पडद्याआड झालेला हा अपघात इतका अचानक होता की, दोन्ही वाहनांच्या चालकांना नियंत्रण मिळवण्याची संधीच मिळाली नाही.
advertisement
भीषण धडकेत गाडीचं नुकसान
ही धडक इतकी जोरदार होती की, धडकेचा आवाज दूरपर्यंत गेला. धडकेनंतर शिवशाही बसच्या पुढील भागाचे आणि सीएनजी ट्रकाचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे अपघातात सीएनजी गॅस ट्रक असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण होते. अपघाताच्या तीव्रतेमुळे बसमधील प्रवाशांना जबर धक्का बसला. क्षणार्धात प्रवासाचा आनंद विरून जाऊन सर्वत्र आरडाओरड आणि गोंधळ सुरू झाला.
वाहतूक विस्कळीत
या भीषण धडकेत शिवशाही बसमधील साधारण ४ ते ५ प्रवाशांना दुखापत झाली आहे. अपघातानंतर लगेचच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वेळीच मदत मिळाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली असली, तरी या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती.
पोलिसांकडून तपास
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा सुरू केला. धुक्यामुळे अपघात झाला असला तरी, दोन्ही चालकांच्या बाजूने काही निष्काळजीपणा झाला आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. दोन्ही वाहनांचे झालेले मोठे नुकसान आणि जखमी प्रवाशांची स्थिती पाहता, महामार्गावरील असुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
