सोलापूर – गेल्या काही दिवसांपासून राज्यावर अवकाळी संकट घोंघावतंय. सोलापूर जिल्ह्यात देखील वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. मोहोळ तालुक्यातील पापरी येथे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास आस्मानी संकटानं हिरावून घेतलाय. शेतकरी दत्तात्रय कमद यांची दीड एकर केळीची बाग आडवी झालीये. यामध्ये 10 ते 12 लाख रुपयांचं नुकसान झालंय.
advertisement
केळीची बाग भूईसपाट
शेतकरी दत्तात्रय विठोबा कदम यांची पापरी येथे दीड एकरात केळीची शेती आहे. दत्तात्रय कदम यांनी एक केळीचे रोप 25 रुपये प्रमाणे 2200 रोपांची दीड एकरात लागवड केली. लागवड, औषध फवारणी असा सगळा खर्च मिळून त्यांना 55 हजार रुपयांचा खर्च आला होता. तर दहा महिन्यात केळीचे व्यवस्थापन करण्यासाठी दीड लाख रुपयांपर्यंत खर्च झाले. जवळपास दोन ते अडीच लाख खर्चून जपलेली बाग अचानक आलेल्या वादळात आडवी झाली.
उन्हाळ्यातलं पैशाचं पिक, पण यंदा काय झालं? खर्चही निघेना, शेतकऱ्याला रडवलं! Video
10 ते 12 लाखांचं नुकसान
ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी कसरत करून केळीची बाग जोपासली. परंतु, काही मिनिटांत आलेल्या वादळानं हातातोंडाशी आलेला घास ओढून नेला. दीड एकर केळीची बाग भूईसपाट झाली. केळीची बाग उद्ध्वस्त झाल्यने कदम यांचे 10 ते 12 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घातलेला खर्चही निघणार नसल्याने शेतकरी अडचणीत असून कदम यांनी मदतीची मागणी केली आहे.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील पापरी येथे वादळी पावसानं मोठं नुकसान झालंय. केळीसह विविध शेती पिके आडवी झाली असून शेतकरी संकटात सापडला आहे. तसेच काही ठिकाणी मोठी झाडे आणि विजेचे खांब देखील पडले आहेत. याप्रकरणी लवकरात लवकर पंचनामे करून सरकारने मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीये.