अजय आपल्या काही मित्रांसोबत माचणूर येथील श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात फिरण्यासाठी गेला होता. जटाशंकर घाटावर पोहण्यासाठी नदीच्या पात्रात उतरल्यानंतर, अचानक पाय घसरल्याने तो खोल पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागला. मित्रांनी आणि स्थानिक नागरिकांनी त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र नदीच्या पात्रात काळानं त्याच्यावर झडप घातली होती.
advertisement
अजय हा केवळ एक तरुण नव्हता, तर आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ होता. त्याचे स्वप्न पोलीस दलात भरती होण्याचे होते. त्यासाठी तो माचणूर येथील जयहिंद करिअर अकॅडमीमध्ये दिवस-रात्र घाम गाळत होता. मैदानी चाचणी असो वा लेखी परीक्षा, प्रत्येक गोष्टीत तो आघाडीवर असायचा. यंदा वर्दी मिळवूनच घरी येईन, हा त्याचा निर्धार एका क्षणात भीमेच्या पात्रात विरून गेला. त्याच्या पश्चात आई, वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. ऐन तारुण्यात मुलाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने पुजारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसरला पाहण्याचे आई-वडिलांचे स्वप्न आता कधीच पूर्ण होणार नाही, ही जाणीव सर्वांचे डोळे ओलावणारी आहे.






