सीना नदीला आलेल्या महापुराचा फटका नदीकाठच्या गावांना बसला आहे. 16 ते 18 दिवसांपासून नदीकाठच्या गावात राहणाऱ्या ग्रामस्थांना संघर्ष करावा लागत आहे. मोहोळ तालुक्यातील आष्टी गावाला सुद्धा या महापुराचा जबरदस्त फटका बसला आहे. आष्टी गावात राहणाऱ्या 13 वर्षीय वैभव देशमुख या चिमुकल्याच्या वडिलांनी 4 एकरात कांदा, मका आणि उसाची लागवड शेतामध्ये केली होती. पण अतिवृष्टी आणि सीना नदीला आलेल्या महापुरामध्ये शेतामध्ये लागवड केलेली पिके वाहून गेली आहेत. तसेच आंब्याची बाग देखील पाण्याखाली गेल्याने तिचं देखील नुकसान झाले आहे. नदीला आलेल्या या महापुरात वैभवाच्या घराचे देखील नुकसान झाले आहे.
advertisement
सीना नदीचं पाणी वैभव याच्या घरच्या उंबरठ्यापर्यंत आलं होतं. तेव्हा वैभवचे आई-वडिलांनी जीवनावश्यक वस्तू घेऊन पुराच्या पाण्यातून वाट काढत बाहेर आले. नदीला आलेल्या महापुरात वैभव यांच्या 10 कोंबड्यादेखील वाहून गेल्या आहेत. शाळा चालू झाल्यावर वडिलांनी नवीन दप्तर, वह्या आणि शालेय साहित्य घेऊन दिले होते. ते देखील नदीला आलेल्या महापुरात वाहून गेलं आहे. महापुराचा थरार सांगत असताना वैभवचा कंठ भरून आला होता.