ठाण्यातील घंटाळी परिसरातील कोट्यवधी रुपयांच्या भूखंड व्यवहारातून सुरू झालेल्या लाच प्रकरणाने ठाणे महापालिकेत मोठी खळबळ उडवली आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना २५ लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका नामांकित विकासकाने घंटाळी परिसरातील एक मोक्याचा भूखंड विकसीत करण्यासाठी घेतला होता. त्या भूखंडावर तीन अनधिकृत गाळे होते. ते काढून देण्यासाठी पाटोळे यांनी सुरुवातीला 10 लाख रुपये घेतले, मात्र कारवाई झाली नाही. विकासकाने अनेकदा भेटीगाठी घेतल्यानंतर पाटोळे यांनी आणखी 15 लाख रुपयांची मागणी केली.
advertisement
महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यालयात कार्यक्रम सुरू असतानाच, पाटोळे यांनी विकासकाला रोख रक्कम घेऊन येण्यास सांगितले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास विकासक महापालिका मुख्यालयात पोहोचला आणि पैसे देताच एसीबीच्या पथकाने धडक कारवाई करत पाटोळे यांना रंगेहात पकडले.
ठाण्यात कारवाई, मुंबईतून सूत्रे हलली?
या घटनेनंतर ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पाटोळे यांच्या ठाण्यातील राजकीय पाठबळावर आणि मुंबईतून दिलेल्या आदेशांवर सध्या पडदा उचलला जात आहे. ठाणे महापालिका आणि राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार, लाचखोरी प्रकरणातील आरोपी अतिक्रमण विभागातील उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यावर ठाण्यातील एका बड्या नेत्याचा राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा सुरू आहे. तर, विकासक हा देखील एका राजकीय नेत्याच्या जवळील आहे.
लाच घेऊन विकासक हा उपायुक्तांच्या भेटीला गेला होता. मात्र, हा विकासक जवळपास साडेपाच तास त्यांच्या भेटीसाठी ताटकळत होता. त्यानंतर मुंबईतील लाचलुचपत विभागाने गृह खात्याच्या आदेशानंतर उपायुक्तांभोवती कारवाईचा फास आवळला. या प्रकरणानंतर अटक ठाण्यातून झाली, पण सूत्रं मुंबईतून हलली, अशी चर्चा प्रशासकीय वर्तुळात रंगली आहे.