ठाणे - राज्यामध्ये अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद हे महत्त्वाचे सण साजरे होत असल्याने प्रचंड जनसमुदाय मिरवणुकीमध्ये सामील होत असतो. अशावेळी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून दरवर्षी शहरांमध्ये जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली जाते. वाहतूक कोंडीमुळे अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो, म्हणूनच मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई वाहतूक प्रशासनाच्या वतीने पुढील नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
advertisement
यावर्षी सुद्धा अपर पोलीस महासंचालक वाहतूक विभाग यांचे कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उद्या 17 सप्टेंबर रोजी 1 वाजेपासून ते 19 सप्टेंबर 2024 रोजीच्या रात्री ईद ए मिलाद च्या मिरवणुका संपेपर्यंत जड-अवजड मालवाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना नवी मुंबई, ठाणे, मुंबईमध्ये प्रवेश करण्यास पूर्णतः बंदी असल्याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
या अधिसूचनेमध्ये अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळण्यात आली आहे. त्यामुळे पुण्याकडून मुंबईकडे येणाऱ्या सर्व जड अवजड वाहनांना (heavy vehicle) मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग (एक्सप्रेसवे) व जुना मुंबई-पुणे या दोन्ही महामार्गावर पुढे जाऊ न देता थांबविले जाणार आहे. तसेच यामुळे वाहतूकदारांच्या वेळ व मालाचे नुकसान होऊ नये म्हणून 17 आणि 18 सप्टेंबर या दोन दिवशी एक्सप्रेस वे तसेच जुना मुंबई पुणे महामार्गाचा प्रवास टाळावा, असे आवाहन अपर पोलीस महासंचालक, (वाहतूक) महाराष्ट्र राज्य यांच्याकडून करण्यात आले आहे.