वर्धा : राज्यभरात शाळा सुरू झाल्या असून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे. अशातच वर्ध्यामध्ये पुरात तीन शाळकरी विद्यार्थी अडकल्याची घटना घडली. तिन्ही विद्यार्थी स्मशानभूमीच्या शेडमध्ये जीव मुठीत घेऊन थांबले होते. अखेरीस या मुलांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे.
वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील डिगडोह इथं यशोदा नदीला पूर आल्याने तीन शाळकरी विद्यार्थी अडकले होते. तिघेही विद्यार्थी पाण्याने वेढलेल्या उंच ठिकाणी थांबून राहिले. नागझरी येथील दहाव्या वर्गात शिकणारा भाविष कापसे आणि डोगडोह येथील त्याचे दोन सहकारी शाळा सुटल्यावर घरी येत असताना पुराच्या पाण्यात अडकले होते. यशोदा नदीवर डिगडोह इथं पुलाचं काम सुरू असल्याने पाणी साचून राहिलं होतं.
advertisement
घटनेची माहिती गावकऱ्यांनी तातडीने अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या तीन विद्यार्थ्यांना वाचविण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आलं. देवळी नगरपालिका फायर ब्रिगेडची चमू घटनास्थळी पोहचलं. मुलांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. जिल्हा शोध आणि बचाव पथक देखील घटनास्थळी दाखल झालं होतं. अखेरीस शर्थीचे प्रयत्न करून तिन्ही विद्यार्थ्यांना पुरातून सुरक्षित बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलंय. सुरक्षितपणे बाहेर काढल्यानंतर तिन्ही विद्यार्थ्यांची प्रकृती तपासण्यात आली. तिघांचीही प्रकृती स्थिर आहे. या बचावकार्याच्या वेळी देवळीचे तहसीलदार समर्थ क्षीरसागर, आमदार राजेश बकाने घटनास्थळी उपस्थितीत होते.