उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांनी नुकसानीचा अंदाज घेतला. त्यांच्यासोबत शिवसेना नेते संजय राऊत, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार ओमराजे निंबाळकर आदी नेते उपस्थित होते. नुकसान भरपाई लगोलग देण्याबरोबर शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
पीएम केअर फंडातले ५० हजार कोटी दिले तरी शेतकरी कर्जमुक्त होतोय
advertisement
बिहारमध्ये निवडणुका आहेत. तेथील महिलांच्या खात्यात नरेंद्र मोदी १०-१० हजार टाकणार आहेत. मला महाराष्ट्रातील सरकारला सांगायचे आहे, डबल इंजिन सरकार आहे म्हणून सांगता ते केवळ धूर सोडायला काय? राज्यात ओला दुष्काळ आहे. केंद्राकडे जा. कोरोना काळात पीएम केअर फंडात महाराष्ट्रातल्या उद्योगपतींनी आणि भाजप आमदार खासदारांनी अडीच लाख कोटी दिले. त्यातील ५० हजार कोटी दिले तरी शेतकरी कर्जमुक्त होतोय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
पंचांग बघून योग्य वेळ ठरवणार आहे का, ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीस यांना सवाल
कर्जमाफीविषयी विचारल्यावर योग्य वेळी कर्जमाफी जाहीर करू, असे मुख्यमंत्री फडणवीस सांगतात. पण त्यांची योग्य वेळ कधी येणार? पंचांग बघून योग्य वेळ ठरवणार आहे का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारले.
बँकेच्या नोटिसा शिवसेना शाखेत द्या, पुढे काय करायचं, हे आम्ही पाहतो
लाडक्या बहिण योजनेतून महिलांना १५०० रुपये देताय, पण तिचं घर आजच्या परिस्थितीत १५०० रुपयांत सावरलं जाणार आहे का? लाडक्या बहिणीचे शेत खरवडून गेले आहे, शेतात उभे पीक आडवे झाले आहे, लाडक्या बहिणीच्या मुलांचे दफ्तरं, वह्या, पुस्तकं सगळं वाहून गेलं आहे. अशा परिस्थितीत त्यांनी करायचे? शेतकऱ्यांना बँकेच्या कर्जाप्रकरणी नोटिसा येऊ लागलेल्या आहेत. शेतकऱ्यांनी बँकांच्या नोटिसा एकत्र करून शिवसेना शाखेत द्या, पुढे काय करायचं, हे आम्ही पाहतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.