परंपरेप्रमाणे शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी महाराज पार्कवर संपन्न झाला. तुफान पावसात मेळावा होणार की नाही, याची चर्चा राज्यात होत होती. परंतु निष्ठावान शिवसैनिकांनी पावसाची तमा न बाळगता नेहमीप्रमाणे मेळाव्यासाठी गर्दी केली होती. उद्धव ठाकरे यांनीही सोन्यासारखी माणसं म्हणत सभेला जमलेल्या शिवसैनिकांच्या मनात स्फुर्लिंग चेतवले. आपल्या भाषणात त्यांनी भाजपच्या नेत्यांवर हल्ले चढवत आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा एकप्रकारे नारळ फोडला.
advertisement
गद्दार गँग टीका टाळून भाजपकडे मोर्चा
उद्धव ठाकरे गेली तीन वर्षे सातत्याने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गद्दार गँग म्हणून प्रहार करतात. पक्षफुटीला तीन वर्षे होऊनही गद्दार, चोर अशा मुद्द्यांवर उद्धव यांचा भर असतो. पण यंदा पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका टाळून मुंबईतील आपला शत्रू भारतीय जनता पक्षच आहे, हे उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून दाखविण्याचा प्रयत्न केला. मुंबईतील रस्ते, महापालिकेच्या ठेवी, बीडीडी टाळींच्या पुनर्वसनाचे श्रेय, अशा महापालिकेच्या मुद्द्यांशी संबंधित प्रश्नांवरून त्यांनी भाजपवर शरसंधान साधले. दुसरीकडे मुंबई महानगर पालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आव्हान आम्ही मानत नसल्याचे थेट संकेतही ठाकरे यांनी दिले.
मुंबई महापालिकेत प्रमुख आव्हान भारतीय जनता पक्षच
आगामी मुंबई महापालिका निवडणूक अगदी तोंडावर आहे. पुढच्या तीन महिन्यात मुंबई महापालिकेची निवडणूक होईल. विधानसभा निवडणूक गमावल्यानंतर ठाकरे यांची मुंबईत सर्वांत मोठी अग्रिपरीक्षा आहे. या निवडणुकीत शिवसेनेसमोर भारतीय जनता पक्षच प्रमुख विरोधक असणार आहे. भाजपला मात द्यायची असेल तर २०१७ च्या महापालिका निवडणुकीप्रमाणे भाजपच्या थेट अंगावर जायला लागेल, हे स्पष्ट असल्याने शिवाजी पार्कच्या भाषणातून ठाकरे यांनी त्याची झलक दाखवली.
शेतकऱ्यांच्या मुद्यावर मोर्चा काढण्याचा इशारा देऊन सरकारला कोंडित पकडले
मराठवाड्यात झालेली अतिवृष्टी आणि अद्याप शेतकऱ्यांना न दिलेली मदत यावर राज्य सरकारवर काहीसे बॅकफूटला आहे. हेक्टरी ८५०० रुपये देण्याच्या घोषणेवरून शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधी प्रचंड रोष आहे. हाच रोष ओळखून उद्धव ठाकरे यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच हेक्टरी ५० हजारांची मागणी करून जर सरकारने दिवाळी मदत दिली नाही तर मराठवाड्यात सरकारविरोधी मोर्चा काढण्याचा इशारा दिला. यानिमित्ताने उद्धव ठाकरे यांनी बॅकफूटला असलेल्या सरकारला आणखी खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करून शेतकऱ्यांच्या मनात शिवसेनेबद्दल सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
भाजपच्या हिंदुत्वाला ठाकरेंच्या महाराष्ट्रधर्माने उत्तर
उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुंबई महापालिकेत निवडून आली तर खान महापौर होईल, अशी टीका भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केली होती. त्यांच्या टीकेला उत्तर देताना ठाकरे यांनी महाराष्ट्र धर्माचा जयजयकार केला. तुम्ही राज्यात सत्तेत आल्यावर जशी धारावी गिळली तसे महापालिकेत सत्तेवर आलात तर मुंबई गिळंकृत कराल असे म्हणत भाजपच्या हिंदुत्वाला महाराष्ट्रधर्माने उत्तर दिले.