मुंबईतील आझाद मैदानावर आज उद्धव ठाकरे यांनी गिरणी कामगारांच्या मोर्चात हजेरी लावली. यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. गिरणी कामगारांना मुंबईतच घरं मिळाली पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. आज गिरणी कामगारांची दुसरी तिसरी पिढी आहे. कामगारांसाठी जे ठरलं, त्यानुसार त्यांना काही मिळाले नाही. कामगारांच्या उरावर टॉवर उभे केले. सोन्यासारखी जागा गिरणी मालकाच्या घशात टाकली. ज्यांनी मुंबई मिळवून दिली. त्यांना शेलू आणि वांगणीला पाठवलं. आमची ठाम मागणी आहे. गिरणी कामगारांना धारावी आणि कुर्ला मदर डेअरीच्या जागी जागा द्या, अशी मागणी त्यांनी केली.
advertisement
आम्ही दोन्ही एकत्र आलो ना...
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात पुढे म्हटले की, आम्ही दोन्ही भाऊ आलो ना एकत्र. कशासाठी आलो. आम्ही आमच्या राजकीय पोळ्या भाजत बसलो असतो. पण आम्ही तसं केलं नाही. प्रबोधनकारांचे आम्ही दोन्ही नातू. माझे आजोबा आणि बाळासाहेब तसेच माझे काका श्रीकांत ठाकरे हे तिघेही संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात होते आणि आमच्या डोळ्या देखत मुंबई तोडली जात असेल, मराठी माणूस भरडला जात असेल तर आम्ही नतद्रष्टा सारखे भांडत बसू? आम्ही मिटवून टाकली भांडणं, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
मराठी माणसाच्या मुळावर जो येईल...
उद्धव यांनी पुढे म्हटले की, “आता उभे राहिलो. जो जो मराठी माणसाच्या मुळावर येईल त्याला मुळासकट उखडून टाकण्यासाठी आम्ही आलो आहोत. त्यामुळे धीर सोडू नका. हिंमत हरू नका. शेलू आणि वांगणीला अदानीला पाठवायचं आणि धारावीत आपला गिरणी कामगार आलाच पाहिजे, ही मागणी घेऊन यायचं” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “जोपर्यंत आपण एकत्र येत नाही, तोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही. एकजुटीची वज्रमूठ अशीच ठेवा. तुम्हाला आम्ही न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.