विरार : विरारमध्ये बुधवारी मध्यरात्री इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. विरार (पूर्व) येथील नारंगी परिसरातील रमाबाई अपार्टमेंट या इमारतीची एक विंग अचानक कोसळली. या दुर्घटनेत अनेक रहिवासी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती. आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 जणांना वाचवण्यात यश आले आहे.
advertisement
विरारमधील नारंगी परिसरातील इमारत कोसळल्याची घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. गणेशोत्सवाच्या दिवसात ही घटना घडल्याने एकच हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. या अपार्टमेंटमध्ये एकूण 50 सदनिका आहेत. त्यापैकी अंदाजे 12 सदनिका कोसळल्या असून ढिगाऱ्याखाली 20 च्या आसपास लोक अडकले असावेत अशी भीती व्यक्त केली जात होती. इमारत कोसळल्यानंतर
अंधेरी येथून एनडीआरएफची अतिरिक्त तुकडी घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दल, स्थानिक पोलीस व महानगरपालिका यंत्रणांच्या मदतीने बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टीने रमाबाई अपार्टमेंट शेजारील ४ मजली इमारत व आजूबाजूच्या चाळी रिकाम्या करून रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. प्रभावित नागरिकांसाठी समाज मंदिरात तात्पुरते निवारा शिबीर उभारण्यात आले
वसई-विरार महापालिका क्षेत्रातील विजयनगर भागात घडलेल्या इमारत दुर्घटनेला 32 तासांहून अधिक कालावधी लोटला. आतापर्यंत ढिगाऱ्यातून काही जणांना बाहेर काढण्यात आले आहे. यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला असून, एक जण जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल असल्याची माहिती महापालिकेने दिली. अजूनही काही नागरिक अडकले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
दुर्घटनेची बातमी कळताच मुंबईसह इतर भागातील नातेवाईकांनी विरारकडे धाव घेतली. परिसरात आक्रोशाचे वातावरण होते. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दुःखाचे सावट पसरल्याने स्थानिक नागरिक हळहळ व्यक्त करत होते. कुणाची आत्या, कुणाचा दीर, तर कुणाची सासू ढिगाऱ्याखाली दबल्याने नातेवाईकांच्या डोळ्यात अश्रू आणि हृदयात असहाय्यतेची भावना दिसून आली.