मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगे पाटलांनी मुंबईच्या आझाद मैदानात तळ ठोकला आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव मुंबईत धडकला आहे. मुंबईत मराठा बांधवांचा झंझावात पाहायला मिळतोय. आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत माघार घेणार नाही असा निर्धार मराठा आंदोलकांनी घेतलाय. एकीकडे जरांगे पाटलांनी आरक्षणासाठी एल्गार पुकारला असताना दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सूचक विधान करुन एक प्रकारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कोंडीच केली आहे.
advertisement
मराठा आरक्षण प्रश्नावर एकनाथ शिंदेच उत्तर देतील, असे राज ठाकरे सूचकपणे म्हणाले. मराठा आरक्षण प्रश्नावर दोन ते तीन प्रश्न त्यांना विचारले गेले. परंतु त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे एकनाथ शिंदे हेच देऊ शकतात, असे राज ठाकरे म्हणाले. तसेच मनोज जरांगे मुंबईत का आलेत, शिंदेंना विचारा, असे राज ठाकरे म्हणाल्याने त्यांच्या बोलण्याचे विविध अर्थ काढले जात आहेत.
राज ठाकरेंच्या या वक्तव्याला मनोज जरांगेंच्या आंदोलनाची पार्श्वभूमी आहे. गेल्या वर्षी जरांगेंचा मोर्चा नवी मुंबईत धडकला होता. त्यावेळी राज्याची सूत्रे एकनाथ शिंदे यांच्या हाती होती. मराठा समाजातील कुणबी नोंदी असलेल्या व्यक्तींना आणि त्यांच्या सगेसोयऱ्यांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याविषयीचा आध्यादेश तत्कालीन शिंदे सरकारने काढला होता. आता राज ठाकरेंनी शिंदेंना त्याची आठवण करुन दिलीय.
एकीकडे राज ठाकरे यांनी शिंदेंना घेरलेलं असतानाच दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊतांनीही शिंदेंवर निशाणा साधलाय. फडणवीसांना अडचणीत आणण्याचा शिंदेंचा प्रयत्न असल्याचे संजय राऊत म्हणाले.
मराठा आरक्षणावरून सुरू झालेल्या राजकीय वादात उद्धव ठाकरेही मागे नाही. शुक्रवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदेवर निशाणा साधला. तसेच एकनाथ शिंदेंनी दिलेल्या आश्वासनाची आठवणही करून दिली...
ठाकरे बंधूंसह विरोधकांनी एकनाथ शिंदेंची आरक्षणाच्या प्रश्नावरून कोंडी केलीय. तर एकनाथ शिंदेंनीही विरोधकांच्या आरोपांवर जोरदार पलटवार केलाय. मराठ्यांना न्याय देण्यास ठाकरे अपयशी ठरल्याचे सांगत त्यांच्याच कार्यकाळात सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकले नाही, असे शिंदे म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नी तोडगा काढण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. अशातच आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय कुरघोडीही सुरू झाल्याचं दिसून येतंय. आणि यातून राजकारणही तापलंय.