गायिका अंजली भारती यांनी भंडारा जिल्ह्यातील फुलमोगरा येथे भीम मेळाव्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीविषयी केलेल्या आक्षेपार्य विधानामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
"कोणत्याही व्यक्तीला काम करत असताना त्याला दिलेला संविधानाचा अधिकार आणि जगण्याचा अधिकार प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने जगत असतो. अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं चुकीचं आहे.
advertisement
राज्य महिला आयोगाने याची दखल घेतलेली असून भंडारा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना पत्र व्यवहार करत या संपूर्ण घटनेची आणि चित्रफितीची यावर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. ज्या पद्धतीने आक्षेपहार्य वक्तव्य केलेला आहे. कायद्याच्या चौकटीतून निश्चितपणे कारवाई केली जाईल' असं रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलं.
'अंजली भारतीवर गुन्हा दाखल करा'
दरम्यान, गायिका अंजली भारती यांच्याा वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. या वक्तव्याचा तीव्र निषेध करत भाजप महिला आघाडीच्या वतीने नागपूरचे पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आलं आहे. भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल झाल्या. अंजली भारती यांच्या वक्तव्यामुळे महिलांचा अपमान झाला असून सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे, असा आरोप त्यांनी केला.
'अंजली भारतींचा कार्यक्रम होऊ देणार नाही'
तसंच, येत्या १ फेब्रुवारी रोजी अंजली भारती यांचा नागपुरात नियोजित कार्यक्रम असल्याची माहिती देत, या कार्यक्रमाला पोलिसांनी कोणत्याही परिस्थितीत परवानगी देऊ नये, अशी मागणी करण्यात आली. जर पोलीस प्रशासनाने कार्यक्रमाला अनुमती दिली, तर तो कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशाराही महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी तातडीने योग्य कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
