धाराशिव: हवामान, पाणी आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेती ही बेभरवशाची मानली जाते. परंतु, काही शेतकरी यातूनही मार्ग काढत प्रयोगशील शेती करतात आणि एक नवा आदर्श निर्माण करतात. धाराशिवमधील रामराजे गोरे आणि बंधू नागेश गोरे या करोडपती शेतकरी बंधूंची 'कृषी झुंज' अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. कधीकाळी नाला बिल्डिंगवर बिगारी म्हणून काम करणारे गोरे बंधूंची आता वर्षाची कमाई दीड कोटी रुपये आहे.
advertisement
गोरे बंधू मूळचे धाराशिवमधील भूम तालुक्यातील अंतरगावचे आहेत. 1993 मध्ये रामराजे गोरे यांचं दहावीचं शिक्षण झालं. घरची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे ते नाला बिल्डिंगवर बिगारी कामाला जायचे. त्यानंतर सैन्य भरतीसाठी प्रयत्न केले. मात्र अपयश आलं. पुन्हा त्यांनी पुणे गाठलं आणि टेल्को ग्रुपमध्ये काही काळ काम केलं. हे सगळं सुरू असतानाच त्यांना शेतीत काहीतरी करण्याची इच्छा होती.
40 लाख रुपयांच्या बंगल्यावर बनवला जेसीबी, फळबागही फुलवली; धाराशिवमधील प्रेरणादायी गोष्ट!
गाव गाठलं अन् सुरू केली शेती
रामराजे यांनी पुण्यातील नोकरी सोडली. मिळालेल्या थोड्याफार पैशातून शेती करायचा ठरवलं. तेव्हापासून त्यांची कृषी झुंज सुरू झाली. शिल्लक पैशातून आधी विहीर खोदली आणि आधुनिक पद्धतीनं शेती सुरू केली. या कामात त्यांना बंधू नागेश गोरे यांचीही साथ लाभली. दोघांनी मिळून शेतात विविध प्रयोग केले आणि यश मिळत गेलं, असं गोरे बंधू सांगतात.
कर्जबाजारी माणसाने करुन दाखवलं! हार न मानता सुरू केली बांबू शेती, आज कोट्यवधींची उलाढाल
वर्षाला दीड कोटींची कमाई
गोरे बंधूंनी मिळेल त्या उत्पन्नाची शेतातच गुंतवणूक सुरू केली. आता त्यांच्याकडे दीड एकराचे शेततळे, 3 विहिरी, 9 एकर द्राक्षे, 3 एकर डाळिंब आहे. तर 7 एकर शेतीत मिरची लागवड केलीये. विहीर आणि शेततळ्यांच्या माध्यमातून शेताला पाणी दिलं जातं. यातून त्यांना वर्षाकाठी दीड कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत असल्याचं रामराजे गोरे यांनी सांगितलं.
दरम्यान, गोरे बंधूंच्या स्कॉर्पिओ आणि बुलेटवर कृषी झुंज असं नाव आहे. नाला बिल्डिंगवर काम करणारा बिगारी ते करोडपती शेतकरी असा गोरे बंधूंचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.