महाविकास आघाडीमध्ये काही जागांवर वाद असल्याचे समोर आले आहे. जागा वाटपाचा तिढा वाढण्याकडे काँग्रेस आणि ठाकरे गट एकमेकांना जबाबदार ठरवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आता मध्यस्थी करणार असल्याची माहिती आहे.
मुंबईतील कोणत्या जागांवर वाद...
ठाकरे गट आणि काँग्रेस यांनी मुंबईतील तीन जागांवर दावा केला आहे. यामध्ये भायखळा, वांद्रे पूर्व आणि वर्सोवा या जागांचा समावेश आहे. 2019 च्या निवडणुकीत भायखळामध्ये शिवसेनेचा आणि वांद्रे पूर्वमध्ये काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता. तर, वर्सोवामध्ये भाजपची सरशी झाली होती. भायखळा आणि वांद्रे पूर्वमधील दोन्ही पक्षांचे आमदार आता आपल्या मूळ पक्षासोबत नाहीत.
advertisement
वांद्रे पूर्वचे आमदार झिशान सिद्दिकी हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या मनस्थितीमध्ये असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. सिद्दिकी यांनी 2019 मध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता.
वर्सोवा मतदारसंघातून भाजपच्या भारती लव्हेकर 5,186 मतांनी विजयी झालेल्या. या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे बलदेव खोसा आणि तिसऱ्या क्रमांकावर शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार राजूल पटेल होत्या.
विदर्भात कोणत्या जागांवर दावे?
काँग्रेस आणि ठाकरे गटात विद र्भातील 12 जागांवर वाद आहे. यामध्ये आरमोरी (विद्यमान आमदार भाजप), गडचिरोली (विद्यमान आमदार भाजप), गोदिंया (अपक्ष), भंडारा (अपक्ष), चिमूर (विद्यमान आमदार भाजप), बल्लारपूर (विद्यमान आमदार भाजप), चंद्रपूर (अपक्ष), रामटेक (अपक्ष आमदार-शिवसेना शिंदे गटात प्रवेश), कामठी (विद्यमान आमदार भाजप), दक्षिण नागपूर (विद्यमान आमदार भाजप), अहेरी (विद्यमान आमदार राष्ट्रवादी अजित पवार), भद्रावती अरोरा (काँग्रेस) या जागांवर तिढा कायम आहे.
काँग्रेस नेत्यांनी एका वृत्तपत्राला सांगितले की, शिवसेना ठाकरे गटाकडून विदर्भात अवास्तव मागणी केली जात आहे. ठाकरे गटाने दक्षिण नागपूरची मागणी केली आहे. पण, नागपूर शहरात शिवसेनेचे फक्त दोनच नगरसेवक आहेत. त्यामुळे शहरात ताकद नसताना अवास्तव मागणी केली जात असल्याचे म्हटले.
