मुंबई शहराच्या पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटीसाठी महत्त्वाचा मानला जाणारा प्रस्तावित सहा-लेनचा उन्नत कॉरिडॉर महालक्ष्मी रेसकोर्सच्या काठावरून आणि एनएससीआय डोमजवळून जाईल. या प्रकल्पासाठी कोणत्याही भूसंपादनाची आवश्यकता नाही आणि बांधकामादरम्यान वाहतुकीचा प्रवाहही विस्कळीत होणार नाही, अशी माहिती शहरी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
Mumbai Rain: कमी दाबाचा पट्टा ठरणार त्रासदायक! मुंबई-ठाण्यात हवामान विभागाकडून महत्त्वाचा अलर्ट
advertisement
कसा असेल मार्ग?
नवीन मार्ग लाला लजपतराय रोडवरील कोस्टल रोडच्या प्रवेशद्वाराजवळून सुरू होईल आणि रेस ट्रॅक आणि स्टेडियमच्या बाजूने मोकळ्या जागेतून जाईल. पुढे सेनापती बापट मार्गाच्या एमोसेस रोडच्या टोकाजवळ येईल. तेथून, मोटारचालकांना गोखले रोड, लेडी जमशेद रोड, भवानी शंकर रोड, एनएम जोशी मार्ग आणि पुढे सिद्धिविनायक मंदिर, शिवाजी पार्क, लोअर परळ आणि माहीम सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी सहज प्रवेश मिळेल.
300 कोटींचा खर्च
दरम्यान, प्रकल्पाचा अंतिम आराखडा अद्याप निश्चित झालेला नाही. तरीही 1.5 किलोमीटर लांबीच्या या कॉरिडॉरसाठी 250 ते 300 कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. नवीन लिंकमुळे प्रवासाच्या वेळेत मोठी घट होणार असून 30 मिनिटांचा प्रवास अवघ्या काही मिनिटांत होणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी देखील कमी होईल.
सध्या हाजी अलीहून (तरदेव, पेडर रोड, भुलाभाई देसाई रोड किंवा कोस्टल रोड मार्गे) येणाऱ्या वाहतुकीला वरळी नाका (अॅनी बेझंट रोड किंवा पांडुरंग बुधकर मार्गे) मार्गे लांबून फेऱ्या माराव्या लागतात. नेहरू सायन्स सेंटर रोड, किंवा केशवराव खाडये मार्ग-डॉ. ई. मोझेस रोड, रेसकोर्सभोवती वळण घेऊन आणि दादर आणि परळहून दादर दक्षिणेकडे जाणारी वाहतूक त्याच मार्गाने करावी लागते.
प्रस्ताव तयार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाशी समन्वयातून प्रस्ताव तयार केला आहे. अद्याप या प्रकल्पाला अंतिम स्वरूप आलेले नसले तरी लोकांना विस्थापित न करता, जमीन संपादन न करता प्रवासाचा वेळ कमी करण्याचे आणि गर्दी कमी करण्याचे आश्वासन दिल्याने या योजनेला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
मुंबईच्या भविष्याकडे दूरदर्शी पाऊल
“हा केवळ पायाभूत सुविधांचा प्रकल्प नाही; तर मुंबईच्या भविष्याकडे एक दूरदर्शी पाऊल आहे. मुंबई वाहतूक कोंडीमुक्त करणे आमचे ध्येय आहे. या सिग्नल-मुक्त कॉरिडॉरमुळे सुरळीत आणि सुस्साट प्रवास शक्य होईल. मुंबईकरांच्या वेळेचा आणि जागेचा आदर करणारा जलद, स्वच्छ एमएमआर बांधण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत,” असे शिंदे म्हणाले.
