मुंबई : मुंबई महापालिकेमध्ये महापौर कोण होणार? हे अजूनही गुलदस्त्यात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसवरून आल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. भाजप आणि शिवसेनेच्या एकत्रित आकडेवारीवर संचालन समितीत चर्चा झाली. सध्या राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीची धामधूम सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या निकालानंतर मुंबईच्या महापौरपदाचा प्रश्न निकाली काढण्यात येणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
advertisement
महापौर पदासंदर्भात मुंबईच्या संचालन समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांची मतं जाणून घेतली. महापालिकेतील निवडणूक प्रक्रियेबाबत देखील चर्चा केली. याावेळी महापौर पदासंदर्भात राजश्री शिरवडकर, रितू तावडे, शितल गंभीर, योगिता कोळी यांचे नाव आघाडीवर असल्याचं समोर आलं आहे. सोबतच, स्थायी समिती अध्यक्ष तसंच सभागृह नेत्यासंदर्भात देखील या बैठकीत चर्चा झाली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातील बैठकीनंतरच सर्व पदांबाबत निर्णय होणार आहे, मुंबईचा महापौर जिल्हा परिषद निवडणुकीनंतरच बसणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांची न्यूज १८ मराठीला दिली आहे.
शिवसेनेचे नगरसेवक हॉटेलमधून बाहेर
दरम्यान, मुंबई महापालिकेच्या निकालाला दहा दिवस उलटून गेल्यानंतर मुंबईतील महापौरपदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. भाजप हा सर्वाधिक 89 जागा मिळवत पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असला तरी एकट्याच्या बळावर भाजप सत्ता स्थापन करू शकत नाही. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या 29 नगरसेवक मिळून बहुमताचा आकडा सहज गाठू शकतात. मात्र अजूनही याबाबत दोन्ही बाजूंकडून हालचाल झालेली नाही. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून शिंदेंच्या शिवसेनेनं आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवलं होतं. मात्र हा दबावतंत्राचा भाग असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी हॉटेलमधून चेक आऊट केलं आहे. आता जिल्हा परिषद निवडणुकीत महापौर होईल अशी चिन्ह आहे.
