करळ फाटा ते जेएनपीए मार्ग हा कंटेनर वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे. या मार्गावरच सुमारे 700 मीटर लांबीचा आणि दुपदरी असलेला उड्डाणपूल आहे. हा पूल भारत मुंबई कंटेनर टर्मिनल (बीएमसीटी) म्हणजेच जेएनपीएच्या चौथ्या बंदराशी जोडण्यासाठी उभारण्यात आला होता. या प्रकल्पावर सुमारे 68 कोटी रुपये खर्च करण्यात आला असून काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (NHAI) सोपविण्यात आले होते. मात्र जसखार-रत्नेश्वरी मंदिर परिसरात उड्डाणपुलाच्या काही भागाला तडे जाऊन तो खचल्याचे निदर्शनास आले आहे.
advertisement
कंटेनर वाहतूक बंद
विशेष म्हणजे दररोज या मार्गावरून मोठ्या प्रमाणात जड कंटेनर वाहने ये-जा करतात. अशा परिस्थितीत पुलाचा काही भाग खचल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने पावले उचलत उड्डाणपुलावरील कंटेनर वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व वाहतूक पर्यायी तीन मार्गांवर वळविण्यात आली आहे. यामुळे काही प्रमाणात वाहतुकीचा ताण वाढला असून वाहनचालकांना विलंबाचा सामना करावा लागत आहे.
कामाच्या गुणवत्तेचा प्रश्न
नुकतेच वाहतुकीसाठी खुले करण्यात आलेल्या या उड्डाणपुलाची इतक्या कमी कालावधीत झालेली हानी पाहता कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून याबाबत संताप व्यक्त करण्यात येत असून संबंधित ठेकेदार आणि यंत्रणांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, जेएनपीए प्रशासनाने उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतल्याची माहिती दिली आहे. तसेच तज्ज्ञांकडून पुलाची तपासणी करून पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.






