नेमकं घडलं काय?
आज मुंबईतील परळ बसस्थानकाला अचानक भेट देत मंत्री सरनाईक यांनी चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांची पाहणी केली. या तपासणीदरम्यान विश्रांतीगृहांमध्ये अनेक ठिकाणी मद्याच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या. तसेच काही कर्मचाऱ्यांकडून मद्यपान केल्याची दुर्गंधी येत असल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार अत्यंत गंभीर असून यामुळे संतप्त झालेल्या मंत्री सरनाईक यांनी तेथे उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारत चांगलेच धारेवर धरले.
advertisement
मंत्री सरनाईक काय म्हणाले?
यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, परगावी कर्तव्य बजावणाऱ्या चालक-वाहकांसाठी विश्रांतीगृहांमध्ये उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने ठरवले आहे. मात्र अशा ठिकाणी मद्यपानासारखी कृत्ये होत असतील तर ते केवळ शिस्तभंग नसून प्रवाशांच्या जीवाशी थेट खेळ करणारे अत्यंत धोकादायक कृत्य आहे. मद्यपान करून कर्तव्यावर जाणारा कर्मचारी अपघाताला निमंत्रण देतोच, शिवाय एसटीच्या सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करतो असे त्यांनी स्पष्ट केले.
ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी अनिवार्य
दरम्यान अशा गैरप्रकारांकडे दुर्लक्ष करणारे अधिकारीही तितकेच जबाबदार असल्याचे सांगण्यात आले असून एसटीच्या सुरक्षा आणि दक्षता विभागातील संबंधित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यापुढे कर्तव्यावर जाणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची विशेषतहा चालकांची ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी अनिवार्य करण्यात यावी असे आदेशही त्यांनी दिले.
या दौऱ्यात मंत्री सरनाईक यांनी बसस्थानकातील स्वच्छता, प्रसाधनगृहे तसेच बसेसच्या नियोजनाचीही पाहणी करून प्रवाशांच्या सुरक्षितता व सोयीसुविधांबाबत अधिक दक्ष राहण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
