चेंबूर: राज्यात सध्या नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. तर दुसरीकडे शहरात महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. अशात महाविकास आघाडी आणि ठाकरे बंधूंनी दुबार मतदारांचा मुद्या उचलून धरला आहे. अनेक मतदारसंघामध्ये दुबार मतदारांचे पुरावेच मनसे सैनिक समोर आणत आहे. अशातच चेंबूरमधील पुरष शासकीय भिक्षेकरी गृहामध्ये 100 पेक्षा जास्त भिक्षुकांच्या नावं मतदार यादीत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
advertisement
मुंबईतील चेंबूर परिसरात महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्यता विभागाच्याा वतीने पुरुष शासकीय भिक्षेकारी चालवलं जातं. या ठिकाणी राज्याभरातून भिक्षेकरी आणून सोडले जातात. या ठिकाणी भिक्षेकऱ्यांना आश्रय देणे, त्यांचे पुनर्वसन करणे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशिक्षण देण्याचं काम केलं जातं.
हे केंद्र भिक्षेकऱ्यांसाठी निवारा, भोजन आणि वैद्यकीय सुविधा पुरवते. तसंच, त्यांच्या क्षमता आणि आवडीनुसार त्यांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते, जेणेकरून ते भिक्षा मागणे सोडून सन्मानाने जीवन जगू शकतात, असा या भिक्षेकरी गृहाचा हेतू आहे. पण या ठिकाणी तब्बल १०० हून अधिक भिक्षुकेऱ्यांची नाव याच मतदारसंघाच्या मतदार यादीत मतदार म्हणून नोंदणी झाल्याचं समोर आलं.
या पुरुष शासकीय भिक्षेकरी गृहावर मनसेचे पदाधिकारी पोहोचले. तेव्हा या पुरुष भिक्षेकरी गृहात सध्या राहत नसलेल्या भिक्षेकऱ्यांची नावं सुद्धा मतदार यादीत असल्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. मनसे विभागध्यक्ष माऊली थोरवे आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी या शासकीय भिक्षेकरीगृहात जाऊन या मतदार नोंदीच्या संदर्भात जाब अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे.
'आज आम्ही प्रभाग क्रमांक ५२ चेंबूर इथं बेघर होममध्ये आलो होतो. या शासकीय भिक्षेकरी गृहामध्ये स्टेशनवर, सिग्नलवर किंवा नशेबाज असलेल्या लोकांना इथं आणलं जातं. या ठिकाणी त्यांच्यात सुधारणा करण्यासाठी या ठिकाणी आणतात. पण, या भिक्षेकरूंची नाव इथल्या मतदार याद्यांमध्ये आहे. या ठिकाणाहून अनेक भिक्षेकरू हे सोडून गेले आहे किंवा त्यांचे नातेवाईक त्यांना घेऊन गेले आहे. आम्ही याबद्दल चेंबूर भिक्षेकरी गृहाच्या अधिक्षकांना यांना विचारणा केली असता यातील काही लोक इथं नाही, अशी माहिती दिली. त्यामुळे आमची निवडणूक आयोगांना विनंती आहे की, या गोष्टींची खात्री करावी, जी लोक इथं राहत नाही, त्यांनी नाव वगळावी, अशी मागणी मनसेनं केली. तसंच, जर नाव बदलली नाहीतर मनसे आपल्या स्टाईलने उत्तर देईल, अशा इशारा मनसे विभागध्यक्ष माऊली थोरवे यांनी दिला.
