पडी कौशिक रेड्डी असं अटक केलेल्या आमदाराचं नाव आहे. ते बीआरएस अर्थात भारत राष्ट्र समितीचे विद्यमान आमदार आहेत. शनिवारी तेलंगणा पोलिसांनी खंडणीच्या आरोपाखाली ही अटक केली. वारंगल सुभेदारी पोलिसांनी हुजुराबाद येथील आमदाराला हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेतलं. यानंतर त्यांना चौकशीसाठी वारंगलला घेऊन गेले.
आमदारावर ७५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप
advertisement
ग्रेनाइट खाणीच्या मालकाच्या तक्रारीवरून कौशिक रेड्डी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बीआरएस नेत्याने त्यांना धमकावले आणि ५० लाख रुपयांची खंडणी मागितली, असा त्यांच्यावर आरोप आहे. कमलापूर मंडळाच्या वनगपल्ली येथे खाण चालवणारे मनोज रेड्डी यांनी त्यांच्या पत्नी रमादेवी यांच्यामार्फत ही तक्रार दाखल केली. ग्रेनाइट खाणींवरील जनतेच्या रोषाचे कारण देत आमदाराने २५ लाख रुपये खंडणी घेतली. यानंतर ५० लाख रुपयांची मागणी करत आहेत, असं तक्रारीत म्हटलं आहे.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर कौशिक रेड्डी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळाला नाही. सोमवारी त्यांची याचिका फेटाळून लावली. आमदाराने व्यावसायिकाला केलेल्या धमकीच्या फोनबद्दल सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर पुरावे सादर केले. यावर आमदारांच्या वकिलांकडून युक्तीवाद करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना सबळ पुरावे सादर करता आले नाहीत. यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.
मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारल्याबद्दल अटक- कौशिक रेड्डी
विमानतळावर अटक करताना कौशिक रेड्डी यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी आपली बाजू मांडताना सांगितलं की, ते मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना प्रश्न विचारणे थांबवणार नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या 'बेनामी' खाणीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले, म्हणून आपल्याला अटक झाली, असा दावा रेड्डी यांनी केला. तसेच कोणतीही सूचना न देता अटक केल्याने हा लोकशाहीवर हल्ला असल्याचं देखील त्यांनी म्हटले.