बिजू बाबू हे केवळ राजकारणी नव्हते, तर ते एक धाडसी पायलट, निष्णात उद्योगपती आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे एक बेधडक प्रेमी होते. बिजू पटनायक हे तरुणपणी अत्यंत देखणे, उंच देहयष्टी असलेले आणि साहसी स्वभावाचे होते. विमान उडवण्याच्या छंदापायी त्यांनी शिक्षण अर्धवट सोडलं आणि पायलट झाले. एकदा फ्लाईट घेऊन ते लाहोरला गेले असताना त्यांची गाठ पडली ती ज्ञानवती सेठी यांच्याशी.
advertisement
ज्ञानवती या एका श्रीमंत शीख व्यावसायिक कुटुंबातील कन्या होत्या. त्या काळी मुलींनी टेनिस खेळणं ही फार मोठी गोष्ट होती, पण ज्ञानवती केवळ टेनिस खेळत नव्हत्या तर त्या दिसायला अत्यंत सुंदर आणि तितक्याच धाडसी होत्या. लाहोर क्लबमध्ये बिजू यांनी त्यांना पहिल्यांदा पाहिलं आणि ते पहिल्या नजरेतच त्यांच्या प्रेमात पडले.
बिजू आणि ज्ञानवती यांची मैत्री दिल्ली फ्लाइंग क्लबमध्ये अधिक घट्ट झाली. बिजूंच्या प्रभावामुळे ज्ञानवती स्वतः विमान उडवायला शिकू लागल्या. दोघांच्या भेटी वाढल्या आणि प्रेम बहरलं. एकदा ज्ञानवती यांनी एक धाडसी प्रस्ताव मांडला, पौर्णिमेची रात्र आहे, आपण कोणालाही न सांगता गुपचुप आग्र्याला जाऊया आणि ताजमहाल पाहूया.
ठरल्याप्रमाणे बिजू ज्ञानवतींच्या घरी मुक्कामाला गेले. मध्यरात्री घरचे सर्व झोपल्यावर गॅरेजमधून गाडी बाहेर काढून आग्रा गाठायचा प्लॅन होता. गाडीचा आवाज होऊ नये म्हणून बिजू गाडीला धक्का मारत होते आणि ज्ञानवती स्टिअरिंगवर होत्या. गाडी गॅरेजच्या बाहेर निघणार इतक्यात... बिजूंच्या खांद्यावर कोणाचा तरी हात पडला. त्यांनी मागे वळून पाहिलं तर समोर ज्ञानवतींचे वडील उभे होते. त्यावेळी त्यांच्या प्रेमाबद्दल घरातील सगळ्यांना कळलं.
अखेर घरच्यांची परवानगी मिळाली आणि 1939 मध्ये या जोडीचं लग्न ठरलं. हे लग्न भारताच्या इतिहासातील सर्वात 'स्टायलिश' लग्नांपैकी एक होतं. लग्नासाठी बिजू पटनायक स्वतः 'टायगर मोठ' विमान उडवत वरातींना घेऊन लाहोरला पोहोचले. एकामागून एक विमानं लाहोरच्या आकाशात घिरट्या घालू लागली, तेव्हा संपूर्ण शहरात एकच चर्चा सुरू झाली की "हा कोणता नवरदेव आहे जो चक्क विमानाने वरात घेऊन आलाय?"
विशेष म्हणजे, लग्नानंतर जेव्हा ही जोडी ट्रेनने परतत होती, तेव्हा बिजूंचे वैमानिक मित्र त्या ट्रेनच्या वरून विमानाने घिरट्या घालत त्यांना मानवंदना देत होते.
बिजू पटनायक दोनवेळा ओडिशाचे मुख्यमंत्री राहिले, केंद्रात मंत्री राहिले. त्यांचा वारसा आता त्यांचे चिरंजीव नवीन पटनायक चालवत आहेत, जे गेल्या 22 वर्षांपासून अधिक काळ ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत. बिजू बाबूंच्या तीन मुलांपैकी नवीन हे अविवाहित राहिले, तर त्यांची मुलगी गीता मेहता या प्रसिद्ध लेखिका झाल्या.
