आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीनं प्रवाशांना बाहेर काढायला सुरुवात केली. जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात नेलं. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील लखनऊ इथे घडली. किसान पथ इथे एका खासगी बसला अचानक आग लागल्याने दोन निष्पाप मुलांसह एकूण पाच प्रवाशांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. ही बस बिहारहून दिल्लीच्या दिशेने जात होती आणि या बसमध्ये सुमारे ८० प्रवासी प्रवास करत होते.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्दैवी घटना आज पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली. बसला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत बसमधील पाच प्रवाशांचा जीव वाचवण्यात यश आले नाही.
बसचा इमर्जन्सी दार वेळेवर उघडलं नाही. यामुळे बसच्या मागच्या बाजूला बसलेले प्रवासी आतच अडकून राहिले आणि त्यांना बाहेर पडायला पुरेसा वेळ मिळाला नाही. याच कारणामुळे त्यांचा होरपळून मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
दरम्यान, बसला आग नेमकी कशामुळे आणि कशी लागली, याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी सांगितले की, बसमध्ये पाच-पाच किलोचे सात गॅस सिलेंडर होते. सुदैवाने, यापैकी कोणताही सिलेंडर फुटला नाही. त्यामुळे गॅस सिलेंडर फुटल्याने आग लागली, असे सध्या तरी म्हणता येणार नाही.
आग लागण्याच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी पोलीस कसून तपास करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे बसमधील इतर प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून मृतांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती मदत पुरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे बसच्या सुरक्षिततेचा आणि आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याच्या व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.