1. जयललिता यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1948 रोजी झाला होता. जेव्हा त्या एक वर्षाच्या झाल्या तेव्हा त्यांचं नाव जयललिता ठेवण्यात आलं. हे नाव म्हैसूरमधील 'जय विलास' आणि 'ललिता विलास' या त्यांच्या दोन घरांच्याच नावावरून ठेवलं होतं. फक्त तीन वर्षांच्या वयात त्यांनी भरतनाट्यम हा भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकार शिकण्यास सुरुवात केली होती.
advertisement
2. जयललिता यांना वयाच्या 15 व्या वर्षी त्यांची अभिनेत्री आई संध्या (वेदवती) यांनी तमिळ चित्रपटांमध्ये काम करण्यास भाग पाडलं होतं. अभिनय क्षेत्रात प्रवेश केला तेव्हा जयललिता विद्यार्थिनी आणि राज्यस्तरीय टॉपर होत्या.
3. जयललिता यांना वकील व्हायचं होतं. पण, त्यांचा पहिला चित्रपट इतका यशस्वी झाला की त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. जयललिता यांचा पहिला चित्रपट 'फक्त प्रौढांसाठी' म्हणून प्रदर्शित झाला होता. त्यावेळी जयललिता यांचं वय 18 वर्षांपेक्षा कमी असल्यानं त्या स्वत:चा पहिला चित्रपट पाहू शकल्या नव्हत्या.
4. जयललिता यांनी 85 तमिळ चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. या शिवाय त्यांनी 'इज्जत' या हिंदी चित्रपटातही काम केलं होतं, जो हिट ठरला होता. या चित्रपटात त्यांच्यासोबत धर्मेंद्र यांनी मुख्य भूमिका साकारली होती.
5. जयललिता यांनी सहकलाकार आणि गुरू एमजीआर यांच्या सांगण्यावरून राजकारणात प्रवेश केला. एमजीआर द्रमुकचे मार्गदर्शक होते. जयललितांना प्रचार सचिव बनवण्यात आलं होतं. राजकारणात आल्यावर त्यांना राज्यसभेवर नामांकन देण्यात आलं.
6. मुख्यमंत्री असताना जयललिता फक्त 1 रुपये पगार घेत होत्या. 'आपल्याकडे उत्पन्नाचे मुबलक स्रोत आहेत त्यामुळे पगाराची गरज नाही,' असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या पहिल्या पगाराचा धनादेश स्वीकारण्यास नकार दिला होता. लोकसेवक म्हणून पगार स्वीकारलाच पाहिजे, असं त्यांना सांगण्यात आल्यानंतर त्यांनी एक रुपया पगार स्वीकारला. या निर्णयामुळे लोकांमध्ये त्यांना आणखी लोकप्रियता मिळाली.
7. जयललिता 14 वर्षांहून अधिक काळ तामीळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. 1995 मध्ये मुख्यमंत्री म्हणून पहिल्या कार्यकाळात त्यांनी त्यांचा दत्तक मुलगा सुधाकरन याच्या भव्य लग्नाचं आयोजन केलं होतं. ज्याची 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये नोंद झाली. या रेकॉर्डनुसार, हा विवाह तामीळनाडूची राजधानी चेन्नई येथे 50 एकरांच्या मैदानात पार पडला होता. ज्यामध्ये 1.5 लाखांहून अधिक पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं.
8. जयललिता एकदा 'कुंभकोणम'मधील महाकाम उत्सवात सहभागी झाल्या होत्या ज्याला दक्षिण भारताचा कुंभमेळा म्हणतात. अम्माचे दर्शन घेण्याच्या प्रयत्नात घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. त्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 50 जणांना जीव गमवावा लागला होता.
